Iceland Cricket Trolls Gautam Gambhir : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताच्या या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावरही नेटकरऱ्यांनी आणि अनेक क्रिकेट बोर्डांनी टीम इंडियाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा 9 गडी राखून पराभव झाल्यानंतर, आसइलँड क्रिकेटच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारतीय संघावर खोचक शब्दांत तंज कसण्यात आला आहे. त्यांचे हे दोन्ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
आधी भारताच्या धावसंख्येवरून घेतली फिरकी
ब्रिस्टल टी-20 सामन्यापूर्वी आइसलँड क्रिकेट संघाने पोलंड-ए विरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 158/7 अशी धावसंख्या उभारली होती. योगायोगाने, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानेही तंतोतंत 158/7 धावाच केल्या. या योगायोगाचा दाखला देत आइसलँड क्रिकेटने एक्सवर लिहिले की, “आज आम्ही पोलंड-ए विरुद्ध 158/7 धावा केल्या. आता भारतानेही इंग्लंडविरुद्ध अगदी तीच धावसंख्या उभारली आहे. अखेर याचा अर्थ काय समजायचा?”
Earlier today we scored 158/7 against Poland A. Now India have scored exactly the same against England. What does all of this mean?
— Iceland Cricket (@icelandcricket) July 9, 2026
As the boundaries flow like liquid gold in Bristol, the whereabouts of Gautum Gambhir are now unknown, but he isn’t here with our men’s national squad in Poland. That much we know!
— Iceland Cricket (@icelandcricket) July 9, 2026
…आणि मग गौतम गंभीरला केलं टार्गेट!
भारताच्या पराभवानंतर अवघ्या एका तासात आइसलँड क्रिकेटने दुसरे पोस्ट केले, ज्यामध्ये थेट मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना टार्गेट करण्यात आले. त्यांनी लिहिले की, “ब्रिस्टलमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडत आहे. यादरम्यान गौतम गंभीर नेमके कुठे आहेत, याचा काहीच पत्ता नाही. मात्र, आम्हाला एवढं नक्की ठाऊक आहे की, ते पोलंडमध्ये आमच्या पुरुष संघासोबत नक्कीच नाहीत.”
आइसलँड क्रिकेटच्या या दोन्ही पोस्ट्सना हजारो लोकांनी लाईक केले असून भारतीय चाहत्यांनीही यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारताचा सलग दुसरा टी-20 मालिका पराभव
टी-20 विश्वविजेत्या भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत निराशाजनक ठरला आहे. भारतीय संघ आधी आयर्लंडविरुद्धची टी-20 द्विपक्षीय मालिका 0-2 अशी हरला आणि आता इंग्लंडविरुद्धही त्यांनी मालिका गमावली आहे. ब्रिस्टल येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 158/7 धावा केल्या होत्या. कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 80 धावांची खेळी केली, पण इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. प्रत्युत्तरात इंग्लंडने हॅरी ब्रूक (नाबाद 79) आणि फिल सॉल्ट (नाबाद 59) यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हे लक्ष्य अवघ्या 13.5 षटकांत 1 गडी गमावून पूर्ण केले.
टीम इंडियावर ‘क्लीन स्वीप’चे संकट
पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने आता 3-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता शनिवारी साऊदॅम्पटन येथे होणाऱ्या शेवटच्या टी-20 सामन्यात पराभवाची ही मालिका रोखण्याचे मोठे आव्हान भारतासमोर असेल. जर भारत हा सामनाही हरला, तर इंग्लंड मालिका 4-0 ने खिशात घालेल. या संपूर्ण दौऱ्यावर इशान किशन आणि तिलक वर्मा सारखे प्रमुख फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीला तीन सामन्यांत केवळ 42 धावा करता आल्या, तर शिवम दुबेने गेल्या तीन सामन्यांत मिळून फक्त 29 धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही अर्शदीप सिंगचा अपवाद वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला छाप पाडता आलेली नाही.
हे ही वाचा –