इथे वडिलांचं निधन, तिथे ‘बाघा’ने ‘तारक मेहता..’मध्ये रडत रडत सीन्स केले पूर्ण – Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah actor bagha aka tanmay vekaria reacts on parents demise within months


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय वेकारिया सध्या त्याच्या खासगी आयुष्यात कठीण काळाचा सामना करत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून तो या मालिकेत काम करतोय. प्रेक्षकांकडूनही त्याला प्रचंड प्रेम मिळालं. मात्र वैयक्तिक आयुष्यात अचानक आलेल्या वादळानंतर कामावरही परिणाम झाल्याचं तन्मयने सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच तन्मयचे वडील आणि प्रसिद्ध गुजराती अभिनेते अरविंद वेकारिया यांचं निधन झालं होतं. तर वडिलांच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वीच तन्मयने त्याच्या आईलाही गमावलं होतं. आईच्या निधनातून सावरत असतानाच तन्मयच्या डोक्यावरून वडिलांचंही छत्र हरपलं. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तन्मय मोकळेपणे व्यक्त झाला.

‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत तन्मयने सांगितलं की कशा पद्धतीने ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी या कठीण काळात त्याची साथ दिली. “फक्त या दु:खद काळातच नाही तर असित भाई नेहमीच माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये माझ्या आईचं निधन झालं होतं आणि आता माझे वडील 24 जून 2026 रोजी मला सोडून गेले. मी माझ्या आयुष्यात खूप काही गमावलंय. या प्रत्येक परिस्थितीत असित भाईंनी माझी साथ दिली. ते खूप दयाळू आहेत, त्यांची माझी खूप मदत केली आहे. एका खंबीर भावाप्रमाणे ते माझ्या बाजूने उभे राहिले”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

वडिलांच्या निधनाबद्दल तो पुढे म्हणाला, “माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला असित भाईंचा फोन आला होता. मी त्यावेळी शूटिंगमध्ये व्यस्त होतो. त्यांनी मला वडिलांच्या निधनाची बातमी सांगितली आणि म्हणाले, शूट थांबव आणि तू घरी जा. तुझी तिथे सगळ्यांत जास्त गरज आहे. मात्र काही सीन्स असे होते, जे मला तेव्हाच करायचे होते. त्या सीन्समध्येही भावूक होणं गरजेचं असल्याने मी त्या भावना तिथे व्यक्त केल्या होत्या. सेटवर मी माझे सगळे सीन्स पूर्ण केले आणि त्यानंतर वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालो.”

काही दिवसांपूर्वीच तो मालिकेच्या शूटिंगदरम्यान अचानक भावूक झाला होता. आईच्या आठवणीत तो ढसाढसा रडू लागला होता. त्याची ही अवस्था पाहून निर्मात्यांनी मालिकेचं शूटिंग थांबवलं होतं. निर्माते असित कुमार मोदी यांनी तन्मयला सावरण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला होता. तन्मयला रडताना पाहून सेटवरील इतर कलाकारांच्या आणि क्रू मेंबर्सच्या डोळ्यांतही पाणी आलं होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *