नवी दिल्ली : भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीममध्ये मोठे फेरबदल केले.2028 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी संघ बांधणी म्हणून सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन वगळण्यात आलं, त्याला संघात देखील स्थान देण्यात आलं नाही. टीम इंडियात मोठे बदल करत श्रेयस अय्यरला कर्णधार करण्यात आलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतानं आयर्लंड विरोधातील दोन टी 20 सामन्यांची मालिका गमावली. यानंतर इंग्लंड विरोधातील पहिल्या तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आलेला नाही. पहिला सामना पावसामुळं रद्द झाला असला तरी दुसरा आणि तिसरा टी 20 सामना टीम इंडियाला गमवावा लागला. दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासमोर प्रेक्षकांनी संजू सॅमसनला पुन्हा संधी द्या अशी घोषणाबाजी केली. भारताचे माजी सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी संजू सॅमसनच्या टीम इंडियामधील स्थानासंदर्भात भाष्य केलं आहे. टीम मॅनेजमेंटनं संजू सॅमसनला संधी द्यायची असेल तर टॉप ऑर्डरमध्ये द्यावी, असं म्हटलं आहे.
अभिषेक नायर संजू सॅमसन बाबत काय म्हणाले?
अभिषेक नायर म्हणाले की संजू सॅमसनला संघात परत आणताना असल्यास टीम कॉम्बिनेशन बिघडवू नये. संजू सॅमसनला जर टॉप-3 मध्ये स्थान मिळणार असेल तर त्याला पुन्हा संधी द्यावी. मधल्या फळीत त्याला संधी दिल्यास चांगले रिझल्ट मिळणार नाहीत, असंही नायर यांनी म्हटलं.
अभिषेक नायर म्हणाले की जर तुम्हाला संजू सॅमसनला परत संघात आणायचं असेल तर अशा ठिकाणी फलंदाजीसाठी संधी दिली पाहिजे, जिथं तो यशस्वी होऊ शकेल. संजू सॅमसनला 4,5,6 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणं ही चांगली संकल्पना नाही. संजूनं त्या क्रमांकावर अधिक काळ फलंदाजी केलेली नाही. तिथं तो यशस्वी देखील झालेला नाही, असं अभिषेक नायर म्हणाले.
संजू सॅमसन जेव्हा सलामीला फलंदाजी करतो किंवा टॉप -3 मध्ये फलंदाजी करतो तेव्हा चांगली कामगिरी करतो. तुम्ही जर त्याला त्या स्थानी संधी देत नसाल तर संजू सॅमसनला तुम्ही न खेळवणं चांगलं ठरेल. भारताचा सध्याचा फलंदाजी क्रम आहे तोच कायम ठेवणं योग्य ठरेल.
टीम इंडियानं यावर गांभीर्यानं विचार करावा, गौतम गंभीर बरोबर म्हणाला की भारतानं 190 धावा केल्या. मात्र, धावांचा पाठलाग करताना टीमला संघर्ष करावा लागत आहे. खेळाडूंनी परिस्थिती समजून घेतली नाही त्यामुळं ते योग्य गती पकडू शकले नाहीत. संघात बदल करायचा आहे म्हणून बदल करत असाल आणि संजू सॅमसनला संघात संधी देणार असाल तर जिथं तो यशस्वी होईल तिथं त्याला फलंदाजीला संधी द्यावी, असं अभिषेक नायर म्हणाले.
अभिषेक नायर म्हणाले की उपकप्तान तिलक वर्मा खराब फॉर्मचा सामना करतोय. त्यानं एकदा 45 बॉलमध्ये 56 धावा केल्या आहेत. यानंतर एकाही डावात तो 20 पेक्षा अधिक धावा करु शकला नाही. तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये तिलक वर्मा 11 बॉलमध्ये 3 धावा करुन बाद झाला.