रायगड : मुंबई, कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार (Rain) पाऊस पडला असून अनेक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. रायगड जिल्ह्याच्या खालापूरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या 3000 सिलेंडरच्या टाक्या वाहून जाण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पाताळगंगा नदीमधून (River) वाहून जाणारे सिलेंडर नागरिकांनी गोळा केल्याचा प्रकारही समोर आला आहे. सिलेंडरच्या टाक्या सापडलेल्या व्यक्तींना पुन्हा तहसीलदार किंवा संबंधित डीलरकडे त्या टाक्या जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील खालापूरमधील एलपीजी बॉटलिंग प्लॉट, चावणे यांचे गोडाऊनमधील सिलेंडर असल्याची माहिती उघडकीस आली आहे. खालापूर येथील प्लॉट नं इ-1/7, अतिरिक्त एमआयडीसी, चावणे भागातील सर्व सिलेंडर पाताळगंगा नदीमध्ये वाहून गेल्याची आजची घटना घडली होती. त्यानंतर, पुरवठा विभागाने याबाबत माहिती घेतली असता परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हे सिलेंडर वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
धबधब्याजवळ बुडालेल्या तरुणाचा अखेर शोध
नाशिकच्या चांदवड-देवळा तालुक्याच्या हद्दीतील दहिवड व चिंचवे गावाच्या सरहदीवरील चोर चावडी धबधब्याजवळ असलेल्या डोहात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील एक 21 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना काल ( दिनांक 7 जुलै ) दुपारच्या सुमारास घडली होती. या घटनेंतर काल दुपारी चार वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत स्थानिक तरुण व मालेगाव येथील पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य राबविण्यात आले होते. मात्र, बुडालेल्या तरुणाचा शोध लागला नव्हता. आज सकाळी नऊ वाजेपासून पुन्हा एकदा तरुणाला शोधण्याचे कार्य एन.डी.आर.एफ.च्या जवानांच्या वतीने सुरू करण्यात आले. साधारण सात ते आठ तास सततच्या शोध मोहिमेनंतर धबधब्याजवळ बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. ऋषिकेश शशिकांत संसारे ( वय 21 ) असे तरुणाचे नाव असून चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील तो रहिवासी होता.
हेही वाचा