भाजपचे आमदार राम कदम यांनी आज विधानसभेत मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या आईचा मृत्यू हा कबुतरांमुळे झाला होता, कबुतरांमुळे होणारे आजार अतिशय घातक आहे. माझ्या आईला ILD (इंटरस्टिशियल लंग डिसीज) हा फुफ्फुसांचा गंभीर आजार झाला होता. या आजारावर ठोस औषध उपलब्ध नाही असं विधान केले होते. यावर आता जैन मुनींनी प्रश्न उपस्थित केला आहे. यावर राम कदम यांनी उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तुमच्या आईचा मृत्यू कबुतरांमुळे झाला याला पुरावा काय?
निलेश चंद्रमुनी यांनी राम कदम यांच्या विधानावर बोलताना म्हटले की, कबुतरांमुळे राम कदम यांच्या आईचा मृत्यू झाला ही गोष्ट खोटी आहे. सत्य असेल तर समाजासमोर आणा, मी राम कदम यांना विचारेल कबुतरामुळे तुमची आई मेली याचा पुरावा मला द्या. राम कदम ही धार्मिक व्यक्ती आहे त्यांचे काम चांगले आहे, समिती बसवून निर्णय घेतला पाहिजे.
CM फडणवीसांनी याकडे लक्ष द्यावे – जैन मुनी
पुढे बोलताना मुनी यांनी म्हटले की, ‘वारंवार नेते लोक येतात, कबुतरांवर बोलतात. कोणी म्हणतो माझी आईचा मृत्यू कबुतरांमुळे झाला. प्रत्येकाची आई महान आहे, सभागृहात त्यांनी आईचा मुद्दा मांडायला नको होता. वारंवार मराठी आणि मारवाडी वाद का निर्माण होत आहे. कबुतरखाने स्थलांतरित करा पण काहीतरी निर्णय करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लक्ष घातलं पाहिजे. राम कदम हे हिंदुत्वाचे चांगले कार्यकर्ते आहेत.’
आजार जात किंवा धर्म पाहून होत नाही – कदम
जैन मुनींच्या विधानावर बोलताना राम कदम यांनी म्हटले की, ‘जैन मुनी काय बोलले, हे मला माहीत नाही. पण माझ्या आईचा मृत्यू हा कबुतरांमुळे झाला आहे. यासंदर्भातील काय माहिती त्यांना पाहिजे ती त्यांना भेटून देईन. मला कबुतराचा जीव देखील महत्वाचा आहे, त्यामुळे माझ्या आईला देखील एकही कबुतराचा मृत्यू झालेला आवडणार नाही. त्यामुळे कबुतरखाने शहरी वस्तीतून बाहेर काढून त्यांना शहराच्या बाहेर ठेवलं पाहिजे. यात मी कुठेही राजकारण आणणार नाही आणि आजार हा धर्म किंवा जात बघून होत नाही.’