Vaibhav Sooryavanshi post Viral : भारतीय क्रिकेटचा अवघ्या 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रीडा जगतात प्रचंड चर्चेत आहे. आयपीएल आणि त्यानंतर श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या तिंरगा मालिकेत आपल्या धडाकेबाज फलंदाजीने धमाका उडवणाऱ्या वैभवच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संपूर्ण जग प्रतीक्षा करत आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशी भारतीय संघासाठी मैदानात तुफान आणेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याला पदार्पण करण्याची संधी दिली नाही.
सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही वैभव सूर्यवंशीला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही आणि त्याला पुन्हा एकदा बेंचवरच बसावे लागले. यामुळे चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. अशातच पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी वैभवने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून, त्याने केवळ एका शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे.
Grateful 🙏🇮🇳 ⏳ pic.twitter.com/YkVdNAl74s
— Vaibhav Sooryavanshi (@Vaibhavsooryava) June 30, 2026
वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत
15 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने सामन्यापूर्वी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला. या पोस्टला त्याने Grateful असे कॅप्शन दिले असून, त्यासोबत वाळूच्या घड्याळाचा इमोजी जोडला आहे. दरम्यान, वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान न मिळण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सलामीच्या जागेवरील तगडी स्पर्धा आहे. सध्या संघात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे सलामीवीर म्हणून खेळत आहेत. हे दोन्ही फलंदाज संघाला डाव्या आणि उजव्या हाताचे उत्तम संयोजन देतात. या दोन्ही खेळाडूंनी भारताला 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती, विशेषतः संजू सॅमसनचे योगदान उल्लेखनीय होते. अशा परिस्थितीत, ज्या खेळाडूंनी देशाला विश्वचषक जिंकवून दिला आणि जे सातत्याने धावा करत आहेत, त्यांना बाहेर बसवणे अन्यायकारक ठरेल.
संजू सॅमसनचा फ्लॉप शो अन् वैभवचा मार्ग मोकळा?
नाव मोठे असले तरी आता कर्णधार श्रेयस अय्यर आणि कोच गंभीर यांचा हा युक्तिवाद फिका पडताना दिसत आहे. कारण अनुभवी संजू सॅमसनचा फ्लॉप शो सातत्याने सुरू आहे. गेल्या 3 सामन्यांत संजूने 5, 0 आणि 1 अशा फक्त 6 धावा केल्या आहेत. आयर्लंडविरुद्ध धावा न केल्यामुळे भारताला ती मालिका 2-0 ने गमवावी लागली होती. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही तो 7 चेंडूत अवघा 1 रन काढून बाद झाला, ज्यामुळे भारतीय संघ मोठ्या दबावाखाली आला. त्यामुळे आगामी दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची मोठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला