‘सोनमजी आता थांबा’, …तर माझ्या घरून जेवण पाठवतो, सलमान खानची आंदोलनावर दुसरी भावनिक पोस्ट – Marathi News | Go Back To Your Homes Salman Khan Tells Students To End Protest


अभिनेता सलमान खानने विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची असल्याचे सांगत त्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनाही आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे.

सलमान खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन फोटो पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका स्पष्ट केली. त्याने म्हटले की, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांची सुरक्षितता ही देशाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी कोणतीही चिंता करू नये असेही त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांना घरी जाण्याचे आवाहन

आपल्या पोस्टमध्ये सलमान खानने म्हटलं की, ‘शिक्षण आणि सुरक्षितता या दोन्ही बाबतीत विद्यार्थी ही आपली पहिली प्राथमिकता आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. माननीय पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्विट केले आहे आणि मला विश्वास आहे की पेपर लीक प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या सर्वांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, कृपया आपल्या पालकांकडे आणि घरी परत जा.’

सोनम वांगचुक यांनाही केली विनंती

सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा उल्लेख करत आंदोलन अधिक पुढे न नेण्याचे आवाहन केले. त्याने लिहिले की, ‘सोनम, आता पुरे झाले’, हे आंदोलन आणखी पुढे नेऊ नका. गरज पडली तर हा जाज्वल्य उत्साह दुसऱ्या दिवशीसाठी जपून ठेवा. मात्र, मला वाटत नाही की त्याची गरज भासेल. काहीतरी खा-प्या. तुम्हाला हवे असेल तर मी माझ्या घरून जेवणही पाठवेन.’ या भावनिक संदेशामुळे सलमान खानच्या पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद

सलमान खानच्या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या भूमिकेचे कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे. एका चाहत्याने लिहिले, सलमान सर, तुम्हीच देशाचे पंतप्रधान व्हायला हवे. दुसऱ्या चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘टायगर आला’.

सलमान खानच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्याच्या भूमिकेबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्याने व्यक्त केलेल्या भावना आणि संयमाचे आवाहन याचे स्वागत केले आहे. तर काही जण या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *