श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन; शाहरुखची एक स्वाक्षरी अन् थेट बँकेनं संध्याकाळपर्यंत.. – Marathi News | Shreyas talpade did not qualify for home loan shah rukh khan signature worked after farah khan call


शाहरुख खान, श्रेयस तळपदे, फराह खानImage Credit source: Instagram

दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या युट्यूब चॅनलमध्ये विविध व्लॉग पोस्ट करत असते. सेलिब्रिटींच्या घरी जाऊन ती हे व्लॉग शूट करते आणि यामध्ये ती सेलिब्रिटींची घरंसुद्धा चाहत्यांना दाखवते. नुकतीच ती मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी पोहोचली होती. यावेळी गप्पांदरम्यान श्रेयसने ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट त्याच्या आयुष्याला मोठं वळण देणारा कसा ठरला, याविषयी सांगितलं. याच चित्रपटामुळे मी मुंबईत माझं पहिलं हक्काचं घर खरेदी करू शकलो, असंही श्रेयस म्हणाला. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खाननेच केलं होतं. यामध्ये शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर श्रेयसने शाहरुखच्या खास मित्राची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

फराह खानसोबत गप्पा मारताना श्रेयस म्हणाला, “मी बँकमध्ये गेलो, पण होम लोनसाठी क्वालिफाय झालो नव्हतो. तेव्हा बँकमधल्या एका महिलेनं मला विचारलं, तू सध्या कोणत्या चित्रपटात काम करतोय? मी तिला सांगितलं की, ओम शांती ओम. मग तिने विचारलं, त्यामध्ये कोण-कोणते कलाकार आहेत? मी म्हटलं, शाहरुख खान आहे. त्यावर तिने दिग्दर्शक कोण आहे, असंही विचारलं. तेव्हा फराह खान असं उत्तर दिलं. हे सर्व ऐकून त्या महिलेनं मला विचारलं की, तू एक पत्र देऊ शकतोस का?”

पहा व्हिडीओ-

श्रेयसने पुढे सांगितलं की कशा पद्धतीने फराह खान आणि शाहरुख खान या दोघांनी होम लोन मिळवण्यासाठी त्याची मदत केली. “मी फराहला फोन करून सर्वकाही सांगितलं. त्यानंतर तिने दोन दिवसांत शाहरुख खानकडून एक पत्र मिळवून दिलं. त्याच संध्याकाळी माझं होम लोन मंजूर झालं”, असं तो पुढे सांगतो. हे ऐकून फराहसुद्धा आनंद व्यक्त करते. मात्र यावेळी ती तिच्याच अंदाजात मस्करीसुद्धा करते. “मी खूप खुश आहे, कारण ओम शांती ओम या चित्रपटासाठी आम्ही तुला कितीसे पैसे दिले असतील”, असं म्हणताच श्रेयस आणि त्याची पत्नीसुद्धा हसू लागतात.

2007 मध्ये ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याची निर्मिती शाहरुख खानच्याच रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली होती. हा चित्रपट तेव्हाचा सर्वांत हिट ठरला होता. यातील गाणी आणि डायलॉग्स आजही लोकप्रिय आहेत. याच चित्रपटातून दीपिका पादुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *