राजेश खन्ना यांचा आग्रहावरून किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं, 50 वर्षानंतर क्रेझ कायम – Marathi News | Kishore kumar not ready to sing mere naina sawan bhado song from mehbooda


हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांमध्ये गणले जाणारे ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘मेहबूबा’ या चित्रपटातील हे गाणे सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. मात्र या गाण्याच्या रेकॉर्डिंगमागे एक अत्यंत रंजक आणि कमी परिचित किस्सा दडलेला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक शक्ती सामंता यांची इच्छा होती की हे गाणे दिग्गज गायक मोहम्मद रफी यांनी गावे. परंतु राजेश खन्ना यांचा आग्रह होता की त्यांच्या भूमिकेला आवाज फक्त किशोर कुमार यांनीच द्यावा. राजेश खन्ना यांनी यासाठी ठाम भूमिका घेतली होती. इतकेच नाही तर किशोर कुमार यांनी गाणे गायले नाही तर आपण चित्रपट सोडू अशी भूमिकाही त्यांनी घेतल्याचे सांगितले जाते.

अखेरीस दिग्दर्शकांनी राजेश खन्ना यांची मागणी मान्य केली आणि किशोर कुमार यांना गाणे रेकॉर्ड करण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र रेकॉर्डिंगच्या वेळी किशोर कुमार यांनी पहिल्या टेकमध्ये गाणे जाणीवपूर्वक खराब पद्धतीने गायल्याचे म्हटले जाते. हे ऐकताच शक्ती सामंता नाराज झाले आणि त्यांनी स्टुडिओ सोडून दिला. त्यानंतर किशोर कुमार यांनी पुन्हा एकदा गाणे रेकॉर्ड केले आणि एका टेकमध्येच असे अप्रतिम सादरीकरण केले की ते पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरले.

किशोर कुमार यांच्या आवाजामुळे गाणं ठरलं अजरामर

या गाण्याशी संबंधित आणखी एक विशेष बाब म्हणजे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी या गाण्याचे प्राथमिक ध्वनिमुद्रण किशोर कुमार यांच्याकडे पाठवले होते. त्याचबरोबर या गाण्याचे स्त्री आवृत्तीही असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. स्वतः किशोर कुमार यांना सुरुवातीला वाटत होते की ते या गाण्याला पूर्ण न्याय देऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनीलता मंगेशकर यांनी गायलेल्या आवृत्तीची ध्वनिफीत मागवली. रेकॉर्डिंगच्या सुमारे सात दिवस आधी त्यांनी ती ऐकली आणि त्यानंतर स्वतःची शैली विकसित केली. विशेष म्हणजे, पुढे किशोर कुमार यांची आवृत्ती अधिक लोकप्रिय ठरली.

मात्र चित्रपटाला अपयश मिळूनही ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि भावस्पर्शी गाण्यांपैकी एक मानले जाते. किशोर कुमार यांच्या जादुई आवाजामुळे आणि आर. डी. बर्मन यांच्या सुरेल संगीतामुळे हे गाणे काळाच्या पलीकडे जाऊन अजरामर ठरले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *