या वेब सीरिजचे दोन्ही सिझन्स गाजलेImage Credit source: Instagram
जर तुम्ही सस्पेन्स थ्रीलर कंटेंटचे शौकीन असाल तर जियो हॉटस्टारवर अत्यंत दमदार वेब सीरिज उपलब्ध आहे. जर आतापर्यंत तुम्ही सीरिज पाहिली नसेल तर तुम्ही खूप चांगला कंटेंट चुकवत आहात. या वेब सीरिजला दहापैकी 8.5 अशी तगडी रेटिंग मिळाली आहे. ज्या वेब सीरिजबद्दल आम्ही बोलतोय, त्याच्या प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला मिस्ट्री, गूढ पहायला मिळेल. या सीरिजचे आतापर्यंत दोन सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सीरिजचं नाव आहे ‘असूर’. कोविड महामारीच्या काळात ‘असूर’चा पहिला सिझन प्रदर्शित झाला होता.
2 मार्च 2020 रोजी या सीरिजचा पहिला सिझन ओटीटीवर स्ट्रीम झाला. त्यानंतर 1 जून 2023 रोजी त्याचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या सिझनमध्ये आठ आणि दुसऱ्या सिझनमध्ये 8 असे दोन्ही सिझन्स मिळून एकूण 16 एपिसोड्स आहेत. ‘असूर’ ही एक क्राइम थ्रिलर सस्पेन्स सीरिज आहे. यामध्ये अशीही काही दृश्ये आहेत, जी तुम्हाला विचलित करू शकतात. याच वेब सीरिजमधून अभिनेता अर्शद वारसीने वेब विश्वात पदार्पण केलं होतं. चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील लढाई यात दाखवण्यात आली असून त्याचं कथानक फारच रंजक आहे.
पहिल्या सिझनचं कथानक
वाराणसीमध्ये पूजा करणाऱ्या एका वडील आणि मुलाने या पहिल्या सिझनची सुरुवात होते. यात मुलगाच वडिलांची हत्या करतो. त्यानंतर कथेत थेट 11 वर्षांचा लीप येतो. ही कथा एका फॉरेन्सिक तज्ज्ञाची (बरूण सोबती) आहे, जो परदेशात फॉरेन्सिक सायन्सचा शिक्षण होण्यासाठी सीबीआय सोडतो. त्याच्या फोनवर एकामागून एक को-ऑर्डिनेट्स येतात. त्या को-ऑर्डिनेट्सवर नेहमी एक मृतदेह सापडतो. या घटनांमुळे त्याला भारतात परत यावं लागतं.
एकामागून एक होणाऱ्या या मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या सीरियल किलरला पकडण्याची जबाबदारी सीबीआयवर आहे. संपूर्ण सीबीआय टीम या सीरियल किलरच्या शोधात गुंतलेली आहे, पण त्यांना सतत काही ना काही अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. जेव्हा त्यांना वाटतं की हे प्रकरण सुटणार आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तेच सीरियल किलरच्या जाळ्यात अडकले आहेत. पहिल्या सिझनच्या शेवटी सीबीआयला वाटतं की त्यांनी ‘असूर’ला पकडलं आहे, पण गोष्ट इथेच संपत नाही.
दुसऱ्या सिझनचा क्लायमॅक्स
‘असूर’च्या दुसऱ्या सिझनमध्येही तीच जुनी पात्रं आहेत. अजूनही हा असूर सीबीआयच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात अनेकजण आपल्या प्रियजनांना गमावतात. या सिझनमध्ये पात्रांचं त्यांच्या भावनांशीही द्वंद्व सुरू असतं. दुसऱ्या सिझनचा क्लायमॅक्स इतका चित्तवेधक आहे की तुम्ही शेवटपर्यंत स्क्रीनला खिळून राहाल.
या वेब सीरिजमध्ये अर्शद वारसी (धनंजय राजपूत), बरूण सोबती (निखिल नायर), अनुप्रिया गोयंका (नयना नायर), रिद्धी डोगरा (नुसरत सईद), पवन चोप्रा (शशांक अवस्थी), अमय वाघ (रसूल शेख), विशेष बन्सल यांसारखे कलाकार आहेत. गौरव शुक्ला यांच्या या सीरिजचं दिग्दर्शन ओनी सेन यांनी केलं आहे. अभिजीत खुमान, निरेन भट्ट, ईशा चोप्रा आणि गौरव शुक्ला यांनी लिहिलेल्या या सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 8.5 रेटिंग मिळाली आहे.