मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार


Rohit Pawar :  मुंबईतील पायधुनी परिसरात धक्कादायक घडना घडली आहे. एका 7 वर्षीय निष्पाप अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या सुरक्षारक्षकाने (वॉचमन) बाथरूममध्ये घुसून लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे. या पाशवी कृत्यानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना संतापजनक आणि गंभीर आहे. सरसकट सर्वच खटल्यात नसरापूरप्रमाणे तातडीने न्याय मिळत नाही म्हणून आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही. त्यासाठीच खटले वेगाने निकाली निघणं आणि शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं आवश्यक असल्याचे रोहित पवार म्हणाले.  

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाही मुंबईत पायधुनी परिसरात एका अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर वॉचमनने अत्याचार केल्याची संतापजनक आणि गंभीर घटना घडली. सरसकट सर्वच खटल्यात नसरापूरप्रमाणे तातडीने न्याय मिळत नाही म्हणून आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही. त्यासाठीच खटले वेगाने निकाली निघणं आणि शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं आवश्यक आहे. याबाबत अधिवेशनातही मागणी केली, त्यानुसार सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत. पिडीत चिमुकली लवकर बरी व्हावी, ही प्रार्थना असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे. 

वॉशरूममध्ये घुसून सुरक्षारक्षकाचे अमानुष कृत्य

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित 7 वर्षांची चिमुरडी इमारतीमधील वॉशरूमला गेली असताना, तिथे तैनात असलेल्या नराधम सुरक्षारक्षकाने आत प्रवेश केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर जमावाचा एल्गार, रास्ता रोको

घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. शेकडो नागरिकांनी एकत्र येत पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. एवढेच नव्हे तर, संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्ता अडवून धरत ‘रास्तारोको’ आंदोलन सुरू केले. यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी संयमाने आंदोलक नागरिकांना बाजूला सारत आणि समजूत काढत रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा केला. सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ठाण्याबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *