या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे अधिकाऱ्यांच्या औपचारिक पोशाखात क्लोज्ड-नेक बंदी जॅकेटचा समावेश. भारतीय ओळख अधिक ठळक करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग मानला जात असून ब्रिटिशकालीन परंपरांचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने लष्कराचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.
नवीन नियमावलीनुसार अनेक औपचारिक गणवेशांमधून समारंभिक पाऊच बेल्ट काढून टाकण्यात आले आहेत. तसेच परेडदरम्यान निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तलवार बाळगण्याची सक्तीही समाप्त करण्यात आली आहे.
लष्कराच्या म्हणण्यांनुसार हे बदल लष्करी परंपरा आणि कार्यक्षमतेचे जतन करताना नियमांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. नियमावलीत नमूद करण्यात आले आहे की, ब्रिटिशकालीन अवशेष मानल्या जाणाऱ्या काही पद्धतींचा आढावा घेतल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत जेणेकरून लष्करी परंपरा आधुनिक भारताशी सुसंगत राहतील.
लष्कराने सर्व पदांवरील जवानांसाठी ‘ड्रेस 3B’ नावाचा नवा हिवाळी गणवेशही सादर केला आहे. या गणवेशात अँगोला शर्ट, बॅटल जॅकेट आणि बेरेट टोपीचा समावेश आहे.
याशिवाय अधिकाऱ्यांना आता औपचारिक पोशाख म्हणून बंदगला सूट, लाउंज सूट, कॉम्बिनेशन ड्रेस किंवा टायसह फुलबाह्यांचा शर्ट यांच्यासोबत बंदी जॅकेट परिधान करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हे जॅकेट साध्या आणि गडद रंगाचे असावे तसेच त्यास अनुरूप औपचारिक पॅन्ट आणि बंद बूट घालणे आवश्यक असेल.
नवीन नियमावलीत ब्रिटिशकालीन शब्दावली हटवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अनेक लष्करी संदर्भांमध्ये वापरला जाणारा ‘रॉयल’ हा शब्द अधिकृत वापरातून काढून टाकण्यात आला आहे.
नियमावलीच्या प्रस्तावनेत अॅडज्युटंट जनरल लेफ्टनंट जनरल व्हीपीएस कौशिक यांनी म्हटले आहे की, आधुनिक भारतीय मूल्ये आणि संस्कृतीशी सुसंगत राहण्यासाठी जुन्या ब्रिटिशकालीन परंपरा, उपकरणे आणि शब्दावली टप्प्याटप्प्याने हटवण्याचा हा प्रयत्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सशस्त्र दलांनी अधिकाधिक स्वदेशी परंपरा स्वीकाराव्यात आणि ब्रिटिश राजवटीतून आलेल्या प्रतीकांपासून दूर जावे, यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. लष्करातील हे बदल त्या व्यापक प्रयत्नांचाच एक भाग मानले जात आहेत.
गणवेशाबरोबरच नवीन नियमावलीत वैयक्तिक देखभाल आणि शिस्तीबाबतही कठोर नियम कायम ठेवण्यात आले आहेत.
1)टॅटू आणि शरीरावर पिअर्सिंग करण्यास बंदी कायम.
2)गणवेशात असताना ब्रेसलेट घालण्यास मनाई.
3)धार्मिक विधीच्या दिवशी केवळ एक पवित्र दोरा घालण्यास परवानगी.
4)धार्मिक चिन्हे आणि खुणांवर निर्बंध, मात्र शीख जवानांना अपवाद.
लष्कराने मिशांच्या लांबीबाबतही स्पष्ट नियम घातले आहेत.
1)मिशांची लांबी 12 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी.
2)गणवेशात असताना डिओडोरंट किंवा परफ्यूम वापरण्यास मनाई.
3)मात्र आफ्टर-शेव्ह लोशन वापरण्याची परवानगी कायम.
महिला अधिकाऱ्यांसाठीही नवीन ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे.
1)साध्या रंगाच्या साड्या परिधान करण्यास परवानगी.
2)सरळ टाचांपर्यंत येणाऱ्या पॅन्टसह कुर्ता-सलवार आणि दुपट्टा परिधान करता येईल.
3)स्लीव्हलेस कुर्ता, पॅलाझो पॅन्ट आणि सिगारेट पॅन्ट यांना परवानगी नाही.
महिला अधिकाऱ्यांसाठी खालील वस्तूंवर गणवेशात बंदी घालण्यात आली आहे.
1)लिपस्टिक
2)रंगीत नेलपॉलिश
3)बिंदी
4)नथ
मात्र विवाहित महिलांना सिंदूर लावण्याची परवानगी असेल परंतु तो बेरेट किंवा पीक्ड कॅपखाली झाकलेला असणे आवश्यक आहे.
नवीन ड्रेस कोडची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Indiantechguide या वापरकर्त्याने शेअर केल्यानंतर यावर मोठी चर्चा सुरू झाली.
काही वापरकर्त्यांनी टॅटूवरील बंदीवर टीका केली. एका वापरकर्त्याने लिहिले की, टॅटूंना परवानगी असायला हवी. ही बंदी अनावश्यक आहे.
तर दुसऱ्या वापरकर्त्याने लष्कराच्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, गणवेशातील बदलांपेक्षा प्रशिक्षण आणि व्यावसायिकतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
काहींनी नवीन नियमांबाबत अधिक माहितीची मागणी केली, तर अनेकांनी टॅटू आणि पिअर्सिंगवरील बंदी ही शिस्त आणि ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
एका वापरकर्त्याने म्हटले, लष्कर आधुनिकीकरण करत असले तरी शिस्तीशी कोणतीही तडजोड करत नाही. 12 सेंटीमीटर मिशीची मर्यादा आणि टॅटूंवरील बंदी हे त्याचेच उदाहरण आहे.
तर आणखी एका वापरकर्त्याने नमूद केले की, जगभरातील अनेक लष्करी परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आल्या आहेत. गणवेशाचे आधुनिकीकरण करताना शिस्त कायम राखणे हे वाटते त्यापेक्षा अधिक कठीण काम आहे.
मात्र काहींनी या बदलांचे महत्त्व कमी असल्याचे सांगितले. एका वापरकर्त्याने लिहिले, हिवाळी गणवेशात जॅकेटचा समावेश वगळता फारसे काही नवीन नाही. बाकी सर्व नियम पूर्वीप्रमाणेच आहेत.
भारतीय लष्कराच्या या नव्या ड्रेस कोडमुळे भारतीयीकरण, आधुनिकता आणि शिस्त यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसून येत असून त्यावर देशभरात चर्चा सुरू झाली आहे.