मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे जात ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची घेतली माहिती घेत राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे चांगले सांभाळा, पण गुंड सांभाळायचे बंद करा असा सल्लाही धनंजय मुंडे यांचे नाव घेत जरांगे पाटील यांनी दिला आहे.
परळी वाल्याचे गुंड मस्तावले आहेत आणि माजले आहेत. त्यांच्यामुळे वाकडे कुटुंबीयांचे एक लेकरू गेलं आहे. त्याला जीवाला मुकावं लागल आहे. तर दुसरे बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत. धन्या ( एकेरी उल्लेख ) पदाचा दुरुपयोग करुन हत्या घडवून आणत आहे अशीही टीका जरांगे पाटील यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की निरीक्षकाला समजत नाही का ? की आपण प्रशासनामध्ये आहोत. आरोपींची कसलीही कदर केली नाही पाहिजे.
ज्ञानेश्वर वाकडे यांचा खून झाला, दुसरा सुद्धा मेला पाहिजे. या उद्देशाने पाठीमागे साक्षीदार राहू नयेच ..हा तर उद्देश नव्हता ना त्या पीएसआयचा ? या परळीवाल्याचं ऐकून असा संशय येतो असेही जरांगे यांनी म्हटले आहे. एका बांधवाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी रात्रभर पीआय गाडीत घेऊन फिरतो. पीएसआय 100% दोषी आहे. त्यांनी काळजी घेतली असती तर खून पण झाला नसता. यांना दहा-पंधरा लोकांनी मारले आहे असाही आरोप जरांगे पाटील यांनी केली आहे.
पण हे गुंड सांभाळायचं बंद करा
फडणवीस साहेबाला एकच सांगायचे दहा चांगले सांभाळा, पण हे गुंड सांभाळायचं बंद करा. अजितदादाच्या पक्षाकडून धनंजय मुंडेला न्याय दिला जातो (एकेरी उल्लेख करत) परंतु तो तुमचा आशीर्वाद घेऊन खुन करतो. फडणवीस तुम्ही जाणीव ठेवा अजितदादाच्या पक्षाने पण जाणीव ठेवली पाहिजे, तो पदाचा दुरुपयोग खून करण्यात करतो. खून करण्यासाठी मंत्रीपद घेतात. बाकीचे मंत्री विकास करण्यासाठी मंत्रीपद घेतात. कुणी जीव घेण्यासाठी मंत्रीपद घेतो.
जर पोलीस प्रशासन परळीचा ऐकून तो खून असूनही अपघात दाखवत असतील आणि पीएम रिपोर्ट जर सांगत असेल हा खून आहे आणि तो पीआय म्हणत असेल की हा अपघात आहे. तर फडणवीस साहेब तुमची मान खाली घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत आहे. तुमचं नाव बदनाम होईल, असं परळीवाल्याचं ऐकून करत असेल तर अजितदादाच्या पक्षाला फडणवीस साहेबांनी बळ द्यायचं काम कमी करावे. लोक सहन करतील तोपर्यंत करतील, पण एकेदिवशी खूप मोठा उद्रेक होईल हे फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं. पुढच्या काळात वाकडे कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे असेही जरांगे म्हणाले.