Last Updated:
पतीसोबत मसूरीला फिरायला गेलेल्या पत्नीचा हॉटेलमध्येच संशयास्पद मृत्यू झाला आहे. इंजिनिअर असलेली राधा गायत्री ही तिचा पती श्रीचरण याच्यासोबत मसूरीला फिरायला गेली होती.
मुंबई : पतीसोबत मसूरीला फिरायला गेलेल्या पत्नीचा हॉटेलमध्येच संशयास्पद मृत्यू झाला आहे. इंजिनिअर असलेली राधा गायत्री ही तिचा पती श्रीचरण याच्यासोबत मसूरीला फिरायला गेली होती. नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राधाने मसूरीला जायचा प्लान केला, यानंतर मसूरीच्या होमस्टेमध्ये राधाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला. यानंतर पोलिसांनी राधाचा पती श्रीचरण याला अटक केली आहे. 8 नोव्हेंबर 2025 ला 27 वर्षांच्या राधा गायत्रीचं श्रीचरण याच्यासोबत लग्न झालं होतं. मृत्यू झालेली राधा ही इंजिनिअर आहे तर तिचा पती श्रीचरण आयटी कंपनीमध्ये काम करतो.
नेमकं काय आहे प्रकरण?
मसूरीच्या धनोल्टी रोडवरच्या एका होमस्टेमध्ये गायत्रीचा संशयास्पद मृत्यू झाला, याप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं. घटनेच्या एक महिन्यानंतर पोलिसांनी गायत्रीचा पती श्रीचरण याला दिल्लीतून अटक केली. यानंतर श्रीचरण याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे.
देहरादून पोलिसांनी मसूरीच्या कोर्टातून आरोपी श्रीचरणविरोधात नॉन बेलेबल वॉरंट मिळवलं होतं, यानंतर पोलिसांच्या टीमने सापळा रचून श्रीचरण याला पूर्व दिल्लीच्या मधू विहारमधून अटक केली.
गायत्री आणि श्रीचरण दिल्लीहून आधी हृषिकेशला गेले आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी 14 जूनच्या रात्री 11.30 च्या सुमारास मसूरीच्या होमस्टेमध्ये पोहोचले, पण 15 जूनच्या सकाळी होमस्टेच्या रूममध्ये जमिनीवर गायत्रीचा मृतदेह आढळला. सुरूवातीला श्रीचरण याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 15 जूनच्या रात्री आम्ही 3.30 वाजेपर्यंत दारू प्यायलो आणि झोपायला गेलो. सकाळी जाग आली तेव्हा मी गायत्रीला मृत अवस्थेत पाहिलं, असं श्रीचरणने पोलिसांना सांगितलं, पण घटनास्थळावरची परिस्थिती काही वेगळंच सांगत होती.
बेडशीटवर रक्ताचे डाग, संशयास्पद परिस्थिती
महिलेचा मृतदेह कपड्यांशिवाय जमिनीवर पडलेला होता. बेडशीटवर रक्ताचे डाग होते आणि रूममध्ये दारूच्या दोन रिकाम्या बॉटल होत्या. रूममधून खाण्या-पिण्याच्या वस्तूही जप्त करण्यात आल्या, असं पोलिसांनी सांगितलं.
गायत्रीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचे वडील पी. सुधाकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. गायत्रीच्या घरच्यांनी सुरूवातीलाच जावयाने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासामध्ये पती श्रीचरण याच्याविरोधात पुरावे मिळाले, त्यामुळे त्याच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करून अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
गायत्रीच्या आई-वडिलांना दोघं मसूरीला जाणार असल्याचं माहितीच नव्हतं. ऋषिकेश आणि हरीद्वार फिरल्यानंतर दोघंही 15 जूनला दिल्लीला परत येतील, असं गायत्रीच्या पालकांना सांगण्यात आलं होतं, पण दोघं मसूरीला गेले. गायत्रीने आई-वडिलांना श्रीचरण क्रुर व्यवहर करत असल्याचं आई-वडिलांना सांगितलं होतं. विशाखापट्टणमला माहेरी आल्यानंतर सगळं सांगेन असंही गायत्रीने सांगितलं होतं, त्यातच तिचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे आई-वडिलांचा श्रीचरणवरचा संशय आणखी वाढला आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. श्रीचरणने गायत्रीच्या बॅगमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस लावलं होतं, असंही गायत्रीने आपल्याला सांगितल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 12, 2026 10:42 PM IST
पतीसोबत हॉटेल रूममध्ये होती इंजिनिअर, सकाळी नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, 27 दिवसांनी किलर अटकेत!
