Last Updated:
या घटनेनंतर चिमुकलीच्या आई-वडिलांना सतत फोन येऊ लागले, की ती हरवली आहे आणि सापडत नाहीये. ते लगेचच नसरापूरात पोहोचले. मात्र, सतत फोन येत असल्याने त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टानं अवघ्या 2 महिन्यात निकाल देत आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली. कोर्टानं आणि पोलिसांनी या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला न्याय मिळवून दिला. मात्र, त्या दिवशीचा तो प्रसंग आणि तिची घरातली ती प्रत्येक आठवण आजही तिच्या आई-बाबांच्या अंगावर काटा आणते. लेकीला जाऊन २ महिने होऊन गेले तरी या घटनेबद्दल आजही तिचे बाबा प्रत्येक गोष्ट सांगताना भावुक झाले. माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं, की जेव्हा ही घटना घडली, तेव्हा फक्त मुलगी हरवली असल्याचं सांगून त्यांना नसरापूरला बोलवलं होतं. मात्र, तिथे घरासमोरच दृश्य पाहून तिचे आई-बाबा पुरते हादरले.
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं, की ही चिमुकली आपल्या आजीकडे नसरापूर गेली होती. मात्र, नराधम भीमराव कांबळे याने तिथेच तिला गाठलं. रेकी करून त्याने गोठ्यात नेत चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या केली. या घटनेनंतर चिमुकलीच्या आई-वडिलांना सतत फोन येऊ लागले, की ती हरवली आहे आणि सापडत नाहीये. ते लगेचच नसरापूरात पोहोचले. मात्र, सतत फोन येत असल्याने त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांना वाटलं, की कदाचित आपल्या लेकीचा काही अपघात झाला असेल, तिला रुग्णालयात दाखल केलं असेल. मात्र, जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा घरासमोरची गर्दी, पोलीस, अॅम्ब्युलन्स..हे सगळं पाहून त्यांची गाडीतून उतरण्याची हिंमतही झाली नाही
गर्दीतून बाहेर येत एका व्यक्तीने त्यांना बाजूला नेलं आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा हे सगळं ऐकून त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्या अवस्थेत तुम्ही तिला पाहू नका, असं म्हणत लेकीसोबतची ती शेवटची भेटही त्यांना घेता आली नाही.
आपल्या चिमुकल्या लेकीच्या आठवणीत भावुक झालेल्या वडिलांनी सांगितलं, की आजही घरातल्या भिंतींवर तिने काढलेली चित्र, तिच्या बाहुल्या, ती सतत गायची ते गाणं…सगळं काही तिची आठवण करून देतं. तिची मोठी ६ वर्षांची बहीण आई-बाबांना सतत विचारते की ती घरी कधी येणार? मात्र, बाबा तिला इतकंच सांगतात..की ती देवाकडे गेली आहे. ती आत्ता गणपती बाप्पासोबत खेळत असेल. हे ऐकून ती चिमुकलीही ढसाढसा रडल्याचं सांगताना बाबाही भावुक झाले.
पुढे या घटनेबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, की मला जेव्हा पहिला फोन आला तेव्हा मी एका घऱी पूजा करण्यासाठी गेलो होतो. मात्र, या सगळ्या प्रकरणानंतर मी देवासमोर जाणंच सोडलं होतं. एवढं सगळं करूनही माझ्यासोबत असं का घडलं? या विचाराने ते प्रचंड अस्वस्थ होते, असंही ते म्हणाले.
Pune,Maharashtra
Jul 09, 2026 12:22 PM IST
नसरापूर प्रकरण: तिनं भिंतीवर काढलेली चित्रं, त्या बाहुल्या अन्..; लेकीला शेवटचं पाहायचीही नाही झाली हिंमत, बाबांनी सांगितली त्या रात्रीची वेदना
