राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेवेत प्रवेश केला आहे. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. विकासकामांसाठी आपण सत्तेत सहभागी होत आहोत असं या खासदारांनी म्हटलेलं आहे. काल झालेल्या पक्षप्रवेशानंतर आज ओमराजेंनी केलेल्या एका विधानामुळे आता चर्चा रंगली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
संघर्ष सुरू राहणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, ‘महायुती मध्ये जरी आलो तरी माझा माझ्या जिल्ह्यात संघर्ष कायम राहणार आहे. राज्यात काय होईल मला माहीत नाही, पण जिल्ह्यात मी मांडीला मांडी लावून नाही बसू शकत. राणा पाटलांच एकही मत मला नको. माझ्या खासदार निधीची माहिती 2019 ते 2024 काढायला पाहिजे होती. या कार्यकाळातला एकही पैसा माझा शिल्लक राहिला नाही. खासदार निधीसाठी कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. माझा कार्यकाळ अजून संपला नाही तरीही निधीचे प्रश्न कसे येतात?
… तर अपक्ष लढणार
पुढे बोलताना ओमराजेंनी म्हटले की, ‘मला न्याय हवा होता म्हणून मी राजकारणात आलो. जर न्याय नाही मिळाला तर माझी पुढची भूमिका तुम्हाला दिसेल. 2029 ला जागा नाही सुटली तर अपक्ष लढेन. उद्धव ठाकरे यांचा दौरा झाल्यावर मी सविस्तर बोलेन अशी भूमिका ओमराजे निंबाळकर यांनी घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ओमराजेंनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतल्याने ते आगामी काळात एकनाथ शिंदेंचा आदेश डावलून त्यांना धक्का तर देणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे ?
दरम्यान, काल 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. शिंदे यांनी म्हटले होते की, ‘सहाचे सहा खासदार हे शिवसेनेच्या तिकीटावर उभे राहतील. धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील. शिवसेनेत हे सर्वजण सामील झाले आहे. तुम्ही समजून घ्या काय समजून घ्यायचं ते.’