मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचा (Election) निकाल 22 जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, 11 पैकी 10 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. मात्र, नाशिकमध्ये शिवसेना महायुतीचे उमेवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावरुन, महायुतीमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. मात्र, येथील मतदारसंघातून विजयी झालेल्या गोकुळ गीते यांनी विजयानंतर संध्याकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले आहे. त्यामुळे, तेही महायुतीचाच भाग झाले आहेत. त्यानंतर, आज विधानपरिषदेत (Vidhanparishad) त्यांचा आमदार (MLC) म्हणून शपथविधीही संपन्न झाला.
विधानपरिषद सभागृहात आज राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न झाला. त्यामध्ये, यापूर्वी विधानपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या काही सदस्यांनाही आज शपथ देण्यात आली. त्यामध्ये, खासदार सुप्रिया सुळेंचे जावई अरुण लखानी यांनीही शपथ घेतली. त्यासाठी, रेवती सुळेही विधिमंडळ सभागृहात आल्याचं दिसून आलं. तर, कालच निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांपैकी अनेकजणांनी आज शपथ घेतली. त्यामध्ये, पुण्याचे विक्रम काकडे, सोलापूरचे राजेंद्र राऊत, रत्नागिरीचे अनिकेत तटकरे, साताऱ्याचे धैर्यशील कदम यांच्यासह एकूण 16 आमदारांचा शपथविधी आज संपन्न झाला.
दोन महिन्यात 27 सदस्यांसाठी निवडणूक
दरम्यान, गेल्या दोन महिन्यात राज्यात विधानपरिषदेच्या दोनवेळी निवडणुका झाल्या असून पहिल्या निवडणुकीत 10 जागांसाठी निवडणूक संपन्न झाली. त्यामध्ये, सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आले असून महायुतीने 9 तर महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून एका जागेवर सदस्य निवडून गेले आहेत. आता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 6 बिनविरोध झाले होते, 11 पैकी 10 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तर, महायुतीने 17 पैकी 16 जागा जिंकल्या आहेत, एका जागेवर अपक्ष उमेदवार गोकुळ गिंतेंनी विजय मिळवला. मात्र, ते शिंदेंच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य बनले आहेत.
विधानपरिषदेत आज शपथ पार पडलेले 16 सदस्य
विक्रम काकडे,
अनिकेत तटकरे
धैर्यशील कदम
गोकुळ गिते
राजीव पोतदार
बसवराज पाटील
अरुण लखाणी
अमर राजूरकर
अविनाश ब्राह्मणकर
दुष्यंत चतुर्वेदी
नंदकिशोर महाजन
प्रवीण पोटे
सुहास शिरसाठ
रवींद्र फाटक
राजेंद्र राऊत
प्राजक्त तनपुरे
दरम्यान, अमर राजूरकर यांनी शपथविधी नंतर जय श्रीराम जय भाजपा अशी घोषणा दिली, तर कुणी बार्शीच्या राजेंद्र राऊत यांनी जय शिवराय अशी घोषणा दिली.
हेही वाचा
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story