सातारा : राज्यात सुरू असलेल्या खासदारांच्या फोडाफोडीच्या ऑपरेशन टायगरवरुन (Shivsena) राजकीय वर्तुळात भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन, राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत, सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून समर्थन केलं जात असून विरोधी पक्षाने टीका केल्याचं दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना लोकशाही संपुष्टात येत असल्याचं म्हटलं. आता, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांनीही पक्ष फोडाफोडी आणि शिवसेना उबाठा पक्षातील 6 खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेवर भाष्य केलं आहे. देशात एकाच व्यक्तीची हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची टीकाही त्यांनी केली.
कराडमध्ये माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याने पक्षात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार ‘डी लिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाच्या माध्यमातून उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
देशात एकाच व्यक्तीची हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची टीकाही त्यांनी केली. “लोटस, टायगर, लायन ती काय मला जनावरांची नावं माहिती नाहीत, पण शिवसेना उद्धव ठाकरे गटात विभाजन झाल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे. त्यामुळे पक्षात फूट पडलेली दिसत आहे. नरेंद्र मोदी डी लिमिटेशन विधेयकात बदल करून उत्तर भारतीय राज्यांचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
ईडीची भीती, सत्तेतून पैसा
देशात एका व्यक्तीची हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न सुरू असून लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस आहे. एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला ईडीची भीती, या दुहेरी कचाट्यात राजकारण करणं कठीण झालं आहे. तुम्ही पक्षात आलात तर खोके मिळतील, कॉन्ट्रॅक्ट मिळतील आणि त्यातून चाळीस टक्के कमिशन खा, असं भ्रष्ट राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदी सरकारचं एकमेव उद्दिष्ट सत्ता मिळवणं हेच आहे.”, असेही चव्हाण यांनी म्हटले.
देशाची अर्थव्यवस्था 6 व्या क्रमांकावर
“सुवर्ण जयंती, रौप्य जयंती, प्लॅटिनम जयंती आपण ऐकतो, पण मोदींचा 12 वर्षांचा उत्सव नेमका कशासाठी?” असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. देशाची अर्थव्यवस्था घसरत चालली असून महागाई वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच परराष्ट्र धोरण, पाकिस्तान आणि इराण संदर्भातील भूमिकेवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंडित नेहरू हे सोळा-सतरा वर्षे पंतप्रधान होते. पण फक्त काहीतरी आकडा काढून प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर खरी प्रसिद्धी करायची असेल तर देशातील रुपयाची किंमत कुठे चालली आहे ते सांगा. देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर गेली आहे. महागाई वाढलेली आहे.
हेही वाचा
पुण्यातून ओमराजेंच्या ‘मातोश्री’ म्हणाल्या, रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद