राज्यात राजकीय पटलावर वेगाने घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आता राज्यातही मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फोडून आपली ताकद वाढवली आहे. तर दुसरीकडे जर केंद्रात शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए गेली तर महाराष्ट्रातही बदल संभवत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होते. आज पुन्हा जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चेला उत आला आहे. या भेटीच्या वेळी जयंत पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील होते. या भेटीमुळे आता जयंत पाटील यांना राज्यात अर्थमंत्री पद मिळणार का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी मेजर रिशफल होणार आहे. केंद्रात सहा खासदारांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस तळ ठोकला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन यांची एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. त्याबदल्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन मंत्री पदे मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. यात एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री केले जाणार असून केंद्रीय राज्यमंत्री म्हणून ओमराजे निंबाळकर यांची वर्णी लागणार असल्याचे कालपर्यंत म्हटले जात होते. मात्र, आता नव्या घडामोडीत केंद्रात भाकरी परतल्यानंतर राज्यात देखील बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्याचे अर्थमंत्री खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्थ खाते आपल्या परत द्यावे अशी मागणी लावून धरली आहे. त्यात आता जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची भेट घेतल्यानंतर आता आज रात्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याने चर्चेचा उत आला आहे. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी डावलून हे अर्थमंत्री खाते जयंत पाटील यांना मिळते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे राष्ट्रावादी शरद पवार गटाला अर्थमंत्री पद देण्यास शिवसेनेचा देखील विरोध केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे अर्थ खाते गेले तर आमच्या आमदारांना निधी मिळण्यात अडचणी येतील अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री पद नेमके कोणत्याही राष्ट्रवादी गटाकडे जाते की भाजपाकडे राहाते याकडे लक्ष लागले आहे..