अमरावती : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी विधानपरिषद निवडणुकांसाठी (Election) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज जिल्हाधिकारी (Amravati) कार्यालयातून संबंधित अर्जाची छाननी करण्यात आली. त्यामध्ये, अनेक उमेदवारांचे अर्ज आज बाद झाले असून काही दिग्गज उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, काही ठिकाणी दिग्गज उमेदवारांचाच अर्ज बाद झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाला आहे. तर, अमरावतीमध्ये भाजपचे बंडखोर विल्पव बजोरिया यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे, काँग्रेस उमेदवारामुळे भाजपची (BJP) डोकेदुखी संपली, असंच म्हणता येईल.
अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला होता. मात्र, येथून भाजप कार्यकर्ते असलेल्या विप्लव बजोरिया यांनीच बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. मात्र, आज बजोरिया यांचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनीच विप्लव बाजोरिया यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात संपूर्ण माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांनी म्हटले होते. या आक्षेपावर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांच्यासमोर दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विप्लव बजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, विप्लव बाजोरिया यांच्या बंडखोरीने भाजपची डोकेदुखी वाढली होती. उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
बाजोरिया न्यायालयात धाव घेणार
जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये तब्बल तीन तास युक्तिवाद झाला. या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना विप्लव बाजोरिया यांनी गंभीर आरोप केले. “सर्वांनी मिळून माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी कटकारस्थान रचले. संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव होता. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे,” असे बाजोरिया यांनी सांगितले.
दरम्यान, बाजोरिया यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अमरावती निवडणुकीच्या रिंगणात आता चार उमेदवार शिल्लक राहिले आहेत. महाविकास आघाडीचे हर्षजीत देशमुख, महायुतीचे प्रवीण पोटे पाटील, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. निलेश विश्वकर्मा आणि अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांचे नामांकन अर्ज वैध ठरले आहेत.
निवडणुकीसाठी अर्ज वैध उमेदवार
सुहास शिरसाट -भाजप
देवयानी डोणगावकर – ठाकरे गट
इसाक खान सांडू खान -अपक्ष
समीर अब्दुल सत्तार – अपक्ष
गणेश लोखंडे – अपक्ष
फारुख तूंडीवाले – अपक्ष
अर्ज बाद झालेले उमेदवार
अपक्ष उमेदवार विशाल नादरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला आहे.
हेही वाचा
आणखी वाचा