इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं – Marathi News | England defeated India by 4 wickets in the 2nd ODI leveling the series 1 1 the significance of the Lords match has increased


इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलंImage Credit source: BCCI

भारत इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आहे. त्यामुळे दोन सामन्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेचा निकाल तिसऱ्या सामन्यात लागणार आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील तिसऱ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला. त्यामुळे मनात नसताना प्रथम फलंदाजी वाटेला आली. भारताने या सामन्यात चांगली सुरूवात केली, पण मधल्या फळीत विकेटची रांग लागली आणि धावगतीला ब्रेक लागला. भारताने 44 षटकात सर्व गडी गमवून 233 धावा केल्या आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 4 गडी राखून पूर्ण केलं.

इंग्लंडचा डाव

भारताने विजयासाठी दिलेल्या 233 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने बेन डकेटला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जेकब बेथेलही 4 धावा करून तंबूत परतला. असं असताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जो रूटने विजयी झुंज दिली. त्याच्यासोबत फलंदाजीला आलेले हॅरी ब्रूक 16, सॅम करन 26, जोस बटलर 17, विल जॅक्स 30 धावा करून बाद झाले. पण जो रूट एका बाजूने किल्ला लढवत होता. त्याने भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं आणि विजयाची स्क्रिप्ट लिहिली. त्याचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं आणि भारताच्या घशातून विजयाचा घास खेचून आणला. इंग्लंडने हा सामना 4 गड राखून जिंकला.

भारताचा डाव

भारताकडून रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 30 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी जमली. या जोडीने 60 धावांची भागीदारी केली. पण रोहित शर्मा 26 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर इशान किशनने 8 चेंडू खेळले आणि 1 धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीने 65 धावांची खेळी केली. त्याला उपकर्णधार श्रेयस अय्यरची साथ लाभली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 67 धावा केल्या. विराट कोहली बाद झाल्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या. श्रेयस अय्यर झुंज देत असताना वॉशिंग्टन सुंदर 2, अक्षर पटेल 1, शिवम दुबे 0. गुरनूर ब्रार 7 आणि प्रसिद्ध कृष्णा 0 धावांवर बाद झाले. तर श्रेयस अय्यरने 66, तर जसप्रीत बुमराहने नाबाद 20 धावा केल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *