Maharashtra Rain News : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं काही प्रमाणत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे अनेक भागात पाऊसच न पडल्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. परभणी, बीड, रायगड या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. खरीपाच्या पेरण्यांसाठी हा पाऊस दिलासादायक मानला जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्यांच्यासाठी देखील हा पाऊस समाधानकारक मानला जात आहे.
परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाची हजेरी
परभणी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर पाऊस आला आहे. पावसाने सर्वसामान्यांना दिलासा मात्र शेतकरी अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेतआहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरासह परिसरात अखेर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस तुरळक आणि कमी प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. आज दुपारनंतर ढग दाटून आले आणि काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, वातावरण प्रसन्न झाले आणि नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला. मात्र शेतीच्या दृष्टीने हा पाऊस अद्याप अपुरा असल्याचे चित्र आहे.
केज शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरुवात, शहरातील रस्ते झाले जलमय
बीडच्या केज शहरासह परिसरात गेल्या दोन तासांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसाने केज शहरातील रस्ते जलमय झाले आहेत तर काही ठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाणी साचले आहे. या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी बीड जिल्ह्यात अद्यापही मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागलेत.
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बदलापुरात पावसाची दमदार हजेरी; तर अंबरनाथ उल्हासनगरमध्ये ढगाळ वातावरण
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बदलापूर मध्ये सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र दुपारनंतर पावसाने जोर वाढवलाय. मागील तासाभरा पासून स्टेशन परिसर, कात्रप, बेलवली, वडवली, आणि पनवेल मार्गावर जोरदार पाऊस सुरू आहे. आठवडाभर विश्रांती घेतल्याने काही प्रमाणात उकाडा जाणवत होता. परंतु सध्या सुरू असलेल्या पावसाने वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झालाय. तर तिकडे अंबरनाथ आणि उल्हासनगर मध्ये ढगाळ वातावरण आहे.
अंबाजोगाई तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन
गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज अंबाजोगाई तालुक्यात दमदार पुनरागमन केले आहे. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक आकाश ढगाळून आले आणि वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे कुंबेफळसह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सुकण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना एकप्रकारे जीवदान मिळाले आहे.अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ, वरपगाव, राडी, सातेफळ आणि कानडी परिसरात आज दुपारी वाऱ्यासह पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.
दरम्यान अंबाजोगाई तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक तालुक्यांमध्ये अद्याप पेरणीयोग्य किंवा पिकांना जीवदान देईल असा मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उर्वरित भागातील बळीराजा अजूनही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड मध्ये पावसाची हजेरी
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यामध्ये देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड मधील कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर पावसाने दांडी मारली होती. अखेर आज उत्तर रायगड सह दक्षिण भागात देखील पावसानं हजेरी लावली आहे.