Last Updated:
Vat Purnima 2026 : हिंदू धर्मात वटपौर्णिमा ही अत्यंत खास मानली जाते. या दिवशी सुवासिनी अखंड सौभाग्यासाठी उपवास ठेवतात. यंदा हा उपवास कधी पकडला जाणार आणि शुभ मुहूर्त कधी आहे वाचा.
Vat Purnima 2026 : हिंदू धर्मामध्ये सुवासिनींसाठी वटपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभागाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी संपूर्ण दिवस उपवास करतात आणि वडाच्या झाडाची विधीवत पूजा करतात. उत्तर भारतात ‘वट सावित्री व्रत’ ज्येष्ठ अमावस्येला पाळले जात असले तरी, गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमेचे व्रत पाळण्याची एक पौराणिक परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी वटवृक्षाची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते आणि सत्यवान व सावित्रीची कथा ऐकली जाते. असे म्हटले जाते की हे व्रत अत्यंत फलदायी असून ते पाळल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि यमराज पतीला दीर्घायुष्याचा आशीर्वादही देतात. यंदा अधिमास आल्याने सर्व उत्सव काही दिवस पुढे सरकले आहेत. त्यामुळे यंदा वटपौर्णिमा कधी साजरी केली जाणार, शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घेऊयात.
हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील पूर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा पूर्णिमा तिथी आणि वाराचा अतिशय दुर्मिळ व शुभ संयोग जुळून आला आहे. या वर्षी ज्येष्ठ पूर्णिमा तिथी 29 जूनला साजरी केली जाईल. ‘उदय तिथीच्या’ नियमानुसार 29 जून सुवासिनींनी वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा करायची आहे. पूर्णिमा तिथी 29 जून 2026 रोजी पहाटे 03:07 वाजता सुरू होईल आणि 30 जूनला पहाटे 05:27 वाजता संपेल. 29 जून रोजी दुपारपर्यंत ‘शुक्ल योग’ आणि त्यानंतर ‘ब्रह्म योग’ असणार आहे. हे दोन्ही योग धार्मिक कार्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानले जातात. सोमवार हा दिवस भगवान शिव आणि चंद्राला समर्पित असल्याने या दिवशी पूजा केल्याने व्रताचे फळ अनंत पटीने वाढणार आहे.
हिंदू धर्मात, वटपौर्णिमेचा उपवास अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी मानला जातो. या दिवशी, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. सनातन परंपरेत, वटपौर्णिमेचा उपवास हा केवळ एक धार्मिक विधी नसून, निसर्गाप्रती आदर, वैवाहिक निष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा एक अद्भुत संगम आहे. या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्ष हे त्रिमूर्तींचे निवासस्थान मानले जाते: भगवान ब्रह्मा त्याच्या मुळांमध्ये, भगवान विष्णू त्याच्या खोडात आणि भगवान शिव त्याच्या फांद्या व पानांमध्ये वास करतात. जेव्हा विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला सुती धागा गुंडाळून त्याची प्रदक्षिणा करतात, तेव्हा त्यांना तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळतो. असे म्हटले जाते की या वृक्षाची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Mumbai,Maharashtra
