भारतीय अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तिथे तिरंगी मालिका सुरु आहे. नुकताच भारतीय अ विरुद्ध श्रीलंका अ सामना झाला. ही मॅच क्रिकेटपेक्षा वैभव सूर्यवंशीच्या वादामुळे जास्त गाजली. श्रीलंकन खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीची कळ काढली. मग, वैभवने त्यांना प्रत्युत्तर दिलं. धक्काबुक्की झाली. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी वैभव सूर्यवंशीला मोलाचा सल्ला दिला आहे. भारतीय अ विरुद्ध श्रीलंका अ सामना टाय झाल्यामुळे सुपरओव्हर झाली. तिथे भारतीय संघाचा पराभव झाला. श्रीलंकन खेळाडू हलामबागे सोबत वैभवचा वाद झालेला.
या घटनेनंतर वसीम जाफर यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर वैभव सूर्यवंशीबद्दल मोठं स्टेटमेंट केलं आहे. “वैभव सूर्यवंशीने या घटनेवरुन शिकलं पाहिजे. तो आता वेगाने आपली ओळख बनवतोय. विरोधी खेळाडू त्याला मानसिक दृष्टया त्रास देण्याचा प्रयत्न करतील” असं वसीम जाफर यांनी म्हटलं आहे. “वैभवकडे आता नाव आणि ओळख आहे. म्हणून यापुढेही त्याला चिथावण्याचा प्रयत्न होईल. कुठल्याही परिस्थितीत शाब्दीक प्रतिक्रिया देणं किंवा शारीरिक दृष्टया भिडणं मान्य नाही. वैभवचीच पूर्णपणे चूक असेल असं नाही. पण त्याला आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल” असं वसीम जाफर म्हणाले.
सचिन तेंडुलकरच उदहारण दिलं
“वैभवला आता हे समजून घ्यावं लागेल की, तो अनेक खेळाडूंचा रोल मॉडल बनला आहे. मैदानावरील प्रदर्शनाइतकीच त्याची वर्तणूक सुद्धा महत्वाची आहे. ही घटना त्याच्यासाठी धडा आहे, भविष्यात तो यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने परिस्थिती संभाळेल” असं वसीम जाफर म्हणाले. त्यांनी वैभवला महान फलंदाज सचिन तेंडुलकरच उदहारण दिलं. “सचिनने खूप कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण कदाचितच ते कुठल्या वादात दिसले असतील. वैभवचे आई-वडिल, कोच आणि जवळचे लोक त्याच्याशी या विषयावर बोलतील” अशी अपेक्षा त्यांना व्यक्त केली.
यातून खेळाडूची मानसिक कणखरता दिसते
“क्रिकेटमध्ये मैदानावर शाब्दीक बाचाबाची आणि ऑन फिल्ड ड्रामा गेमचा भाग आहे. यातून खेळाडूची मानसिक कणखरता दिसते. पण हे सर्व एका मर्यादेत झालं पाहिजे. कुठल्याही खेळाडूवर व्यक्तिगत टिप्पणी आणि धक्काबुक्कीपर्यंत विषय पोहोचला नाही पाहिजे” असं जाफर म्हणाले.