भारत आणि यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अंतिम टी20 सामना बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळला जाईल. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा ‘करा किंवा मरा’ सामना आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकण्यात अपयशी ठरला, तर आयर्लंडसारख्या संघाविरुद्ध टी20 मालिका गमावण्याची मोठी नामुष्की त्यांच्यावर ओढवेल. सध्या, दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंड 1-0 ने आघाडीवर आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या टी20 सामन्यात पदार्पणाची संधी देतील की हा युवा सलामीवीर इंग्लंड दौऱ्यावर पदार्पण करेल. जर वैभवने आयर्लंडविरुद्ध सामन्यात पदार्पण केले तर कोण संघाबाहेर बसण्याची शक्यता आहे.
मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 34 धावांनी दारुण आणि धक्कादायक पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी 183 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली. संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा यांसारखे अनुभवी आणि स्टार फलंदाज आणि कर्णधार श्रेयस अय्यर धावा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले, ज्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.
सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे बिहारचा 15 वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशी. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान न दिल्याने अनेक चाहते आणि तज्ज्ञांना आश्चर्य वाटले. तथापि, पहिल्या सामन्यातील आघाडीच्या फळीच्या खराब कामगिरीनंतर, दुसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
जर संघ व्यवस्थापनाने वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला, तर तो कोणाची जागा घेईल हा सर्वात मोठा प्रश्न असेल. वैभव प्रामुख्याने वरच्या फळीतील फलंदाज आहे आणि भारताची आघाडीची फळी आधीच स्टार खेळाडूंनी भरलेली आहे. संघात जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला टी-20 फलंदाज अभिषेक शर्मा, 2026च्या टी-20 विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेला संजू सॅमसन आणि आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन यांचा समावेश आहे. त्यामुळे, त्यांच्यापैकी एकाला वगळणे सोपे नसेल. पण वगळल्याचे झालेच तर 27 वर्षीय खेळाडूचा नंबर लागू शकतो.
इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्यामागे तसे कारण पण आहे. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही लेफ्ड हँडेड जोडी मैदानात उतरण्याची शक्यता नाकारु शकत नाही. जर असे घडलेच तर संजू सॅमसन नंबर तीनवर बॅटिंग करेल.