टीम इंडियाचं उज्वल भविष्य म्हणून वैभव सूर्यवंशीकडे पाहिलं जातं. आयपीएलमध्ये त्याने चमकदार प्रदर्शन केलं. त्यानंतर सिनियर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. टीम इंडियात त्याची निवड झाली. इंग्लंड आणि आर्यलंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी टी20 टीमचा भाग आहे. पण या टूरआधी भारतीय अ संघाचा श्रीलंका दौरा सुरु आहे. या टूरवर वैभव सूर्यवंशीला अजून अपेक्षित प्रदर्शन करता आलेलं नाही. खेळापेक्षा वादामुळे वैभवचं नाव जास्त गाजतय. रविवारी श्रीलंका अ विरुद्धची फायनल वैभव सूर्यवंशीसाठी एक शेवटची संधी आहे. श्रीलंकेतील पीचेस भारत आणि पाकिस्तानपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. श्रीलंकेतील खेळपट्ट्या गोलंदाजाला अनुकूल असतात. पीचकडून बॉलरला मदत मिळते. वेगवान गोलंदाज आणि स्पिनर दोघांना मदत मिळते. भारत-पाकिस्तानच्या तुलनेत श्रीलंकेत काही मैदानात सीमारेषा लांब असते.
सिनियर टीम इंडियाकडून पदार्पण करण्याऐवजी श्रीलंकेचा दौरा वैभव सूर्यवंशीसाठी महत्वाचा होता. आयपीएलमध्ये वैभवने 776 धावा केल्या. यात 16 सामन्यात वैभवने 72 सिक्स मारले. पण श्रीलंकेत वैभवला असं प्रदर्शन करणं जमत नाहीय. आतापर्यंत 50 ओव्हरच्या चार सामन्यात वैभवने 14, 44, 21 आणि 38 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तान अ विरुद्ध त्याने 44 आणि 38 धावा केल्या. तेच श्रीलंकेविरुद्ध त्याला फक्त 14 आणि 21 धावाचं करता आल्या.
वैभवचं काय चुकतय?
वैभव वाट्टेल तसे फटके मारुन विकेट गमावतोय असं नाहीय. तो खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याला त्याच्या शॉट सिलेक्शनमध्ये अजून सुधारणा करावी लागेल. आयपीएलमध्ये सपाट विकेट असतात, त्यामुळे तो त्याच्या हिशोबाने बॅट फिरवू शकतो. पण श्रीलंकेत असं नाहीय. त्याला अजून जास्त संयम दाखवावा लागेल. चारपैकी दोनवेळा तो शॉर्ट पीच चेंडूवर आऊट झाला. ही चिंतेची बाब आहे. आयपीएलमध्ये सुद्धा तो काहीवेळा शॉर्ट पीच चेंडूंवर बाद झालाय.
हे अपयश धुवून काढावंच लागेल
रविवारी भारतीय अ संघाचा श्रीलंका अ विरुद्ध सामना आहे. कदाचित वैभवकडे श्रीलंकेत स्वत:ला सिद्ध करायची ही शेवटची संधी असेल. आतापर्यंत जे झालं ते झालं. पण बॅटिंगच्या तंत्रात काही चुकीचं नाहीय हे वैभवला दाखवून द्यावं लागेल. अजून एकदा वैभव अपयशी ठरला, तर कदाचित त्यांचा टीम इंडियाकडून डेब्यू लांबू शकतो. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावं लागेल. त्यामुळे 21 तारखेच्या फायनलमध्ये वैभवला हे सगळं अपयश धुवून काढावं लागेल.