नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजेच 2027 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे देण्यात आली आहे. भारतानं 2011 नंतर वनडे वर्ल्ड कप जिंकलेला नाहीये, तर 2023 मध्ये भारताचा फायनलमध्येच पराभव झाला. त्यामुळं टीम इंडियानं 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी तयारी सुरु केली आहे. यामुळं सातत्यानं युवा खेळाडूंना संधी देत त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं जातं आहे. वर्ल्ड कपपूर्वी टीमचं एक बेस्ट कॉम्बिनेशन तयार करण्याचा प्रयत्न टीम मॅनेजमेंटकडून केला जात आहे.
टीम इंडिया आणि निवड समितीच्या योजनांनुसार शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघ वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे हे स्पष्ट आहे. प्रामुख्यानं गोलंदाजीमध्ये प्रयोग सुरु असून वरिष्ठ खेळाडूंना बाहेर काढून युवा खेळाडूंना संधी दिलीजात आहे. प्लेईंग इलेव्हनमध्ये भारताचे कोणते गोलंदाज असतील हे सांगणं अशक्य आहे.
सहा खेळाडूंचं स्थान फिक्स
पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतासाठी खेळणेचं टीम इंडियासाठी फायदेशीर आहे. या दोघांनी भारतासाठी तीन पेक्षा अधिक वनडे वर्ल्ड कप खेळले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता निवड समिती दोघांना संघाबाहेर काढण्याचा विचार करु शकत नाही. या शिवाय कर्णधार शुभमन गिलचं स्थान देखील पक्कं आहे.
शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर श्रेयस अय्यर याचं स्थान देखील पक्कं मानलं जातंय. श्रेयस अय्यरला संघातून बाहेर काढल्यास चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं श्रेयस अय्यरचं स्थान पक्कं मानलं जातंय. केएल राहुल पाचव्या स्थानावरील फलंदाजीसाठी आणि वनडे टीमचा विकेटकीपर म्हणून पहिला पर्याय आहे. गोलंदाजीमध्ये फक्त जसप्रीत बुमराहचं नाव पक्क मानलं जातंय. बुमराह फिट असल्यास तो भारताच्या गोलंदाजीचं नेतृत्त्व करेल.
वनडे वर्ल्ड कपसाठी कोणाला संधी मिळणार?
हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाजी ऑलराऊंडर आहे, मात्र तो सातत्यानं दुखापतींचा सामना करत असतो. पांड्या फिट असेल तर वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळेल. फिरकी गोलंदाजीसाठी नवे पर्याय शोधले जाऊ शकतात. हर्ष दुबे आणि सारांश जैन यांच्या नावाचा त्यात समावेश आहे. हर्षित राणा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, अर्शदिप सिंग, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय आहेत. यापैकी कोणाला संधी द्यायची असा प्रश्न निवड समितीसमोर असेल.
टीम इंडियाकडून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कोण स्वीकारणार हा चिंतेचा विषय बनला आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी ऑलराऊंडरवर दिली जातेय. कुलदीप यादव अनेक सामन्यांमध्ये बेंचवरच दिसतो.