Satluj Controversy: 48 तासांत सिनेमा हटवला; IMDb कडूनही ‘सतलज’ला धक्का? आधी 9.5 रेटिंग, आता तीही गायब; मनोरंजनसृष्टीत खळबळ


Satluj Controversy: अभिनेता दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) ‘सतलज’ या चित्रपटाभोवतीचा वाद (Satluj Controversy) काही थांबण्याचं नाव घेत नाही. ZEE5 वरून चित्रपट हटवल्यानंतर आता IMDb वरील रेटिंगही अचानक गायब झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मंगळवारपर्यंत या चित्रपटाला IMDb वर 9.5 रेटिंग दिसत होती. इतकंच नाही, तर सर्वाधिक रेटिंग मिळालेल्या भारतीय चित्रपटांमध्ये त्याची गणना केली जात होती. मात्र बुधवारी ही रेटिंग अचानक हटवण्यात आली. त्यामुळे IMDb च्या प्रणालीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

संजय गुप्तांची संतप्त प्रतिक्रिया

या प्रकरणावर दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोस्ट करत म्हटलं, “कालपर्यंत चित्रपटाला 9.5 रेटिंग होती आणि आज ती गायब झाली. खरं तर मी कधीच IMDb च्या रेटिंगवर विश्वास ठेवला नाही. पण या घटनेतून त्यांच्या सिस्टमवर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्न निर्माण होतो.”

‘चित्रपट कधी रिलीज झाला, कधी हटवला गेला हेही कळलं नाही’

‘सतलज’चे सहलेखक नीरेन भट्ट यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, IMDb वरून रेटिंग का हटवण्यात आली याची कोणतीही माहिती त्यांना देण्यात आलेली नाही. ते म्हणाले, “आम्हाला चित्रपट कधी रिलीज झाला आणि कधी हटवला गेला हेही नीट समजलं नाही. आता IMDb वरून रेटिंगही गायब झाली, पण त्यामागचं कारण कुणीच सांगितलेलं नाही. नेमकी अडचण काय आहे, कुणाला आहे आणि का आहे, यावर कोणतीही स्पष्टता नाही.”

सोशल मीडियावरही संताप

IMDb वरून रेटिंग हटवल्यानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलं, “मी जवळपास 1500 पेक्षा जास्त रिव्ह्यू वाचले आहेत. कितीही विरोध झाला किंवा चित्रपट हटवला गेला तरी सत्य हे सत्यच राहणार.” काही युजर्सनी चित्रपटाच्या 9.6 रेटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

‘अडचण असेल तर स्पष्टपणे सांगा’

‘व्हरायटी इंडिया’शी बोलताना नीरेन भट्ट यांनी संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं. अनेक वर्षांपासून चित्रपटावर नेमका आक्षेप काय आहे, हे कुणीच स्पष्ट केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, “जर चित्रपटात काही समस्या असेल, तर ती स्पष्टपणे सांगितली पाहिजे. कोणतंही कारण न देता चित्रपट हटवणं योग्य नाही.”

‘आमच्याच चित्रपटाला का केलं लक्ष्य?’

काहींचं म्हणणं आहे की, हा चित्रपट भारतविरोधी शक्तींकडून चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो. यावर नीरेन भट्ट म्हणाले, “हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ किंवा ‘द केरळ स्टोरी’सारखे चित्रपट बनू शकतात, तर आमच्याच चित्रपटाला अशा प्रकारे लक्ष्य का केलं जात आहे? एका साध्या चरित्रपटाबाबत अशा निष्कर्षांवर पोहोचण्याला काहीच अर्थ नाही.”

आता न्यायालयात जाणार चित्रपटाची टीम

नीरेन भट्ट यांनी स्पष्ट केलं की, आता चित्रपटाची टीम न्यायालयात जाणार आहे. ते म्हणाले, “जर चित्रपटाबाबत कुणाला आक्षेप असेल, तर तो कायदेशीर मार्गाने मांडावा. आम्हालाही आमची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. ‘उडता पंजाब’च्या वेळीही सीबीएफसीने 94 कट्सची मागणी केली होती. निर्माते न्यायालयात गेले आणि अखेर चित्रपट फक्त एका कटसह प्रदर्शित झाला. आम्हालाही न्याय मिळेल आणि ‘सतलज’ पुन्हा OTT वर स्ट्रीम होईल, अशी अपेक्षा आहे.”

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित, दोन दिवसांतच हटवला

जवळपास चार वर्षे सेन्सॉर प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेनंतर ‘सतलज’ हा चित्रपट 3 जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला होता. मात्र अवघ्या दोन दिवसांतच तो प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला. वृत्तांनुसार, सुरक्षेची कारणं आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नियम, 2021 यांचा हवाला देत सरकारने चित्रपट हटवण्याचे निर्देश दिले होते.

आधी नाव होतं ‘पंजाब 95’

या चित्रपटाचं मूळ नाव ‘पंजाब 95’ होतं. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात तब्बल 127 कट्स सुचवले होते. मात्र निर्मात्यांनी ते मान्य करण्यास नकार दिल्याने प्रमाणपत्राची प्रक्रिया रखडली. त्यानंतर चित्रपटाचं नाव बदलून ‘सतलज’ ठेवण्यात आलं आणि तो थेट OTT वर प्रदर्शित करण्यात आला. मात्र नंतर सरकारकडून सुरक्षा कारणांचा हवाला देत ZEE5 ला चित्रपट हटवण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

‘सतलज’ची कथा काय आहे?

‘सतलज’ हा चित्रपट, ज्याचं आधीचं नाव ‘पंजाब 95’ होतं, हा मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. बँकेत नोकरी करणारे खालरा पुढे पंजाबमधील महत्त्वाचे मानवाधिकार कार्यकर्ते बनले. त्यांनी पंजाबमधील कथित बनावट चकमकी आणि बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या प्रकरणांचा शोध लावला होता. चित्रपटात त्यांच्या 1995 मधील अपहरणापूर्वीच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या प्रकरणात नंतर पंजाब पोलिसांच्या चार कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *