खासदार फुटल्यानंतर आता पक्षाला संघटनात्मक पातळीवर अजून फटके बसू नयेत, म्हणून उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहेत. ज्या जिल्ह्यातील, लोकसभा मतदारसंघातील खासदार फुटले त्या ठिकाणचा दौरा उद्धव ठाकरे यांनी सुरु केला आहे. याची सुरुवात ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघापासून केली आहे. उद्धव ठाकरे आता परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे गटाचे जे सहा खासदार फुटले त्यात परभणीचे संजय जाधवही आहे. संजय जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या परभणी जिल्हा दौऱ्यावर खासदार संजय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते शिवसेनेचे नेते पक्ष प्रमुख त्यांचं प्रभावती नगरीत स्वागत करणार असं संजय जाधव म्हणाले.
“त्यांच्या पक्षाची विचारधारा वेगळी, त्यांच्या लोकांना पाठबळ देण्यासाठी त्यांचं येणं सहाजिक आहे. ठाकरे परिवाराविषयी माझी नाराजी नाही. राजकीय समीकरण बदलली. त्यामुळे इच्छा नसताना मला बदल करून घ्यावा लागला” असं संजय जाधव म्हणाले. ‘उद्धव ठाकरे मला समजून घेतील’,अशी भावना संजय जाधव यांनी व्यक्त केली. “ठाकरे परिवारावर बोलण्या इतका उंचीचा मी नाही, ज्यांनी मला इथपर्यंत आणण्यासाठी योगदान दिलं, त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ आहोत” असं संजय जाधव म्हणाले.
ऑपरेशन तुडवावर संजय जाधव काय म्हणाले?
संजय जाधव यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात उद्धव ठाकरे यांचा मोलाचा वाटा आहे. आमदार-खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 2004 आणि 2009 असे दोन वेळा परभणी विधानसभेतून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. 2014 पासून सलग तीनवेळा त्यांनी परभणीतून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. संजय जाधव यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही मान-सन्मानाची भावना असली, तरी त्यांनी अलीकडेच संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जे खासदार फुटले त्यावर संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवा असं म्हटलं होतं. “तू काय आम्हाला तुडवणार? अरे तुडवायला सुद्धा दम लागतंय ना. संजय राऊत यांनी कधी कुणाला चापट मारली का?” असा सवाल संजय जाधव यांनी विचारला होता.