सध्या सोशल मीडिया इन्फ्लूएंसर प्रसाद वेदपाठक चांगलाच चर्चेत आहे. प्रसादने सोशल मीडियावर त्याच्या घाटकोपर येथील सोसायटीमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने सोसायटीमध्ये जैन समुदायातील साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा उल्लेख केला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्या हटवण्यात आल्या. पण हा पांढऱ्या पट्टीचा प्रकार सर्वांसमोर आणल्यानंतर प्रसाद वेदपाठला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रसादने थेट मनसे अधिकाऱ्यांकडे मदत मागितली होती. आता त्याने मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियाद्वारे दिली होती माहिती
प्रसादने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर, काही लोक माझा पाठलाग करत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, प्लीज माझी मदत करा असे म्हटले होते. तसेच त्याने या पोस्टच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. तसेच त्याने ही पोस्ट मुंबई पोलिसांना देखील टॅग केली होती. प्रसादच्या मदतीला मनसेचे कार्यकर्त्ये आल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण प्रकरणाच्या संबंधित आज प्रसाद वेदपाठकने मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.
प्रसाद वेदपाठक मनसे कार्यालयात पोहोचल्याचे पाहायला मिळाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद वेदपाठकच्या भूमिकेला मनसे पक्षाकडून पाठिंबा मिळणार असून, त्याच्या पाठीशी मनसे पक्ष उभा राहणार आहे. दरम्यान, हे प्रकरण आणखी चिघळणार की निवळणार? हे येत्या काळात समोर येईल.
नेमकं प्रकरण काय?
प्रसाद वेदपाठकने काही दिवसांपूर्वी त्याच्या घाटकोपर येथील सोसायटीमध्ये जैन समुदायातील साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा उचलून धरला होता. त्याने त्याच्या घाटकोपर येथील सोसायटीमध्ये मारण्यात आलेला पांढऱ्या पट्टीचा व्हिडीओ शेअर केला होता. तसेच सोसायटीमधील कोणत्याही सदस्याला न विचारता या पट्ट्या मारण्यात आल्याचे त्याने सांगितले. या वरुन सुरु झालेला वाद वाढल्यानंतर त्यानं आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. आता त्याने थेट मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेतली आहे.