Manoj Muntashir On Student Protest: प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie) सिनेमासाठी पटकथा आणि संवाद लिहिणारे गीतकार, कवी मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) पुन्हा एकदा लोकांच्या रोषाला बळी पडले आहेत. 20 जुलै रोजी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि हिंसाचार यामुळे लोकांचे डोळे पाणावले असून मन दुःखी, संतप्त झालंय. अशा परिस्थितीत, 50 वर्षीय मनोज मुंतशीर यांनी एका अलिकडील मुलाखतीत जंतर-मंतरवरील आंदोलकांना ‘देशद्रोही’ ठरवलंय आणि हे वक्तव्य त्यांनी ‘पूर्ण जबाबदारीनं’ केलंय, असंही त्यांनी सांगितलंय. पण, संगीतकारानं केलेल्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
काही युजर्स त्यांना ‘आदिपुरुष’मधील त्या उथळ संवादांची आठवण करून देत आहेत, तर काहींनी अशी इच्छा व्यक्त केलीय की, सध्याच्या पिढीला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय, तशी वेळ या गीतकाराच्या भावी पिढीवर येऊ नये.
उत्तर प्रदेशातील अमेठी इथे जन्मलेल्या मनोज मुंतशीर यांनी ‘टाइम्स नाऊ नवभारत’ला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ते कधीही जंतर-मंतरवर जाणार नाहीत, कारण तिथे सध्या आंदोलकांशी संबंधित असलेल्या लोकांच्या बाजूला उभं राहण्याची त्यांची इच्छा नाही. ते म्हणाले की, “मी कधीही जंतर-मंतरवर जाणार नाही… मी जाणार नाही कारण जंतर-मंतरचं प्रतिनिधित्व करणारे लोक सध्या जे आहेत, ते दुर्दैवानं… अशा प्रकारचे लोक नाहीत, ज्यांच्यासोबत उभं राहणं मला सोयीचं किंवा योग्य वाटेल…”
मनोज मुंतशीर यांनी ‘नीट’ (NEET) परीक्षेचा पेपर फुटणे आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यांवरही भाष्य केलंय. मुलाखतीत बोलताना त्यांनी, नीटचा पेपर फुटल्याप्रकरणी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार धरलंय.
‘कॉकरोच जनता पार्टी’बद्दल बोलताना ते म्हणाले की, “या देशातील तरुण ‘कॉकरोच जनता पार्टी’पेक्षा अधिक चांगल्या गोष्टीस पात्र आहेत. नीटचा पेपर फुटणं ही चांगली गोष्ट होती, असं जगात कोण म्हणेल? कोण असं म्हणेल? ती घटना चुकीचीच होती. जर एकाही विद्यार्थ्याचा जीव गेला असेल, तर त्यासाठी संपूर्ण यंत्रणा जबाबदार आहे…”
“मी अत्यंत जबाबदारीनं त्यांना देशविरोधी म्हणतोय…” (Manoj Muntashir On CJP Protest)
मनोज मुंतशीर पुढे बोलताना म्हणाले की, “पण चर्चा तर जंतर-मंतरवर जे काही घडतंय त्याबद्दल आहे… मी स्वतःही तिथली भाषणं ऐकतोय आणि तिथे येणाऱ्या लोकांचं निरीक्षण करतोय, असे लोक जे ‘भारताचे तुकडे केले जातील’, अशा घोषणा देतात आणि काश्मीर हा भारताचा भाग नाही असा दावा करतात… मी अत्यंत जबाबदारीच्या भावनेतून त्यांना देशद्रोही म्हणतोय… ते आपल्या प्रभू श्रीरामांचा उल्लेख केवळ ‘सीतेचा पती’ असा करतात… हे अत्यंत अपमानजनक आहे…”
एका युजरनं टिप्पणी केलीय की, “जर हजारो तरुण देशद्रोही असतील, तर…”
मनोज मुंतशीर यांनी दिलेल्या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. एका युजरनं लिहिलंय की, “मनोज मुंतशीर, देशद्रोही असण्याची व्याख्या काय आहे? करिअरसाठी आपली विचारधारा बदलणं? जर हजारो तरुण देशद्रोही असतील, तर मग पंतप्रधानही या देशाला वाचवू शकणार नाहीत…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :