Jagannath Temple : जगन्नाथ मंदिरात ‘या’ लोकांनी चुकूनही करू नये एकत्र दर्शन, काय आहे नेमकं कारण? | अध्यात्म बातम्या


Last Updated:

जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. येथे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक रोज पुरीत येतात. मात्र, जगन्नाथ मंदिराशी जोडलेली एक अत्यंत रंजक आणि जुनी लोकमान्यता आहे.

News18
News18

Jagannath Temple : ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हे हिंदूंच्या चार धामांपैकी एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमयी स्थान मानले जाते. भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक रोज पुरीत येतात. मात्र, जगन्नाथ मंदिराशी जोडलेली एक अत्यंत रंजक आणि जुनी लोकमान्यता आहे, ज्यानुसार अविवाहित जोडप्यांनी एकत्र भगवान जगन्नाथांचे दर्शन घेऊ नये. ही एक लोकश्रद्धा आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. पण यामागचं नेमकं कारण काय?

जगन्नाथ मंदिराची अनोखी श्रद्धा

भगवान जगन्नाथांची प्रसिद्ध रथयात्रा 16 जुलै रोजी सुरू झाली असून आणि 24 जुलै 2026 पर्यंत चालेल. या काळात, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा आपल्या रथांवरून भक्तांना दर्शन देतात. चार धामांपैकी एक असलेले हे मंदिर, आपल्या भव्य रथयात्रेसाठी तसेच अनेक गूढ परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. या परंपरांपैकी एक अशी लोकप्रिय श्रद्धा आहे, जिने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे.

अविवाहित जोडपी येथे एकत्र येत नाहीत

स्थानिक मान्यतेनुसार, जर अविवाहित जोडप्याने एकत्र भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले, तर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा त्यांच्या विवाहात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे, अनेक भक्त आजही या मान्यतेचा आदर करत वेगवेगळे दर्शन घेतात. स्थानिक लोकमान्यतेनुसार आणि धार्मिक विश्वासानुसार, जर कोणत्याही अविवाहित जोडप्याने जगन्नाथ मंदिरात एकत्र दर्शन घेतले, तर राधारानीच्या शापाच्या प्रभावामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांवर विपरीत परिणाम होतो. त्यांच्यामध्ये गैरसमज वाढतात, भांडणे होतात आणि शेवटी त्यांचे लग्न तुटते किंवा नाते संपते असे मानले जाते. याच भीतीपोटी आजही स्थानिक लोक किंवा मंदिर परंपरेची माहिती असलेले भाविक आपल्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसीसोबत मंदिरात एकत्र न जाता, वेगवेगळे किंवा स्वतंत्रपणे दर्शन घेणे पसंत करतात.

नेमकं कारण काय?

लोककथेनुसार, द्वापर युगात, भगवान कृष्णाचे जगन्नाथ रूप पाहण्याच्या इच्छेने राधा राणी पुरीला आल्या. असे म्हटले जाते की, जेव्हा त्या मंदिराच्या गर्भगृहाजवळ पोहोचल्या, तेव्हा तेथील पुजाऱ्याने त्यांना आत जाण्यापासून रोखले. पुजाऱ्याने राधा राणीला सांगितले की, त्यांचे लग्न भगवान कृष्णाशी झालेले नाही आणि म्हणूनच, मंदिराच्या नियमानुसार त्यांना आत प्रवेश दिला जाऊ शकत नाही. हे ऐकून राधा राणीला खूप दुःख झाले. प्रचलित मान्यतेनुसार, भावनेच्या भरात तिने असा शाप दिला की, भविष्यात जे कोणतेही अविवाहित जोडपे एकत्र मंदिरात येतील, त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळे येतील आणि त्यांचे वैवाहिक जीवन अयशस्वी होईल. तेव्हापासून अनेक लोक ही श्रद्धा पाळत आले आहेत.

मंदिरात असा काही नियम आहे का?

मंदिरातील दर्शन सर्व भक्तांसाठी त्यांच्या श्रद्धा आणि परंपरेनुसार खुले आहे. धार्मिक श्रद्धा आणि लोककथा प्रदेशानुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे, ही परंपरा वैयक्तिक श्रद्धेची बाब मानली जाते. भक्त आपापल्या श्रद्धेनुसार याचे पालन करतात, जरी मंदिर प्रशासनाने अविवाहित जोडप्यांना एकत्र भेट देण्यास मनाई करणारे कोणतेही अधिकृत नियम स्थापित केलेले नाहीत.

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *