टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकला. त्यानंतर भारताने शुबमन गिल याच्या नेतृत्वातच 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त सुरुवात केली. भारताने 13 जून रोजी विजयी सलामी दिली. तर 17 जूनला सलग दुसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 20 जून रोजी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात यजमान आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामन्यांच्या वेळेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना हा 26 तर दुसरा आणि अंतिम सामना 28 जून रोजी होणार आहे. श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेतून टी 20i कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. या मालिकेतील सामन्याच्या वेळेबाबत 10 दिवसांआधी मोठी अपडेट समोर आली आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
भारतात गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या टी 20i सामन्यांना संध्याकाळी 7 किंवा साडे 7 पासून सुरुवात होते. आधी आयपीएल स्पर्धेतील सामन्यांना रात्री 8 वाजता सुरुवात व्हायची. मात्र आयपीएल स्पर्धेतील सामन्याची वेळ 8 ऐवजी साडे सात करण्यात आली. भारतात अनेक बाबतीत टी 20i सामन्याची साडे सात ही वेळ आदर्श मानली जाते. मात्र आयर्लंड-भारत टी 20i मालिकेत तसं होताना दिसणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया विरुद्ध आयर्लंड सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. तर सामना रात्री 10 पर्यंत निकाली निघण्याची शक्यता आहे. मात्र सामन्याला 6 पासून सुरुवात करण्याचा निर्णय किती योग्य ठरणार? हे मालिकेनंतर येणाऱ्या टीआरपीच्या आकड्यांवरुनच स्पष्ट होईल.
आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव.