Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल या तरुणासोबत लग्न करायचे नाही म्हणून त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरीसोबत त्याची हत्या केली. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरील कठड्यावरून त्याला ढकलून दिले. दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रेम तिकोण समोर आल्यानंतर पोलिसांनी हा अपघात नसून घातपात असल्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. सियासह चेतन चौधरीला अटक केली. याप्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून गोयल कुटुंबियातील सदस्यांची कसून चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सियाचा भाऊ आणि चेतनचा मित्रा साहिल गोयलची दहा तास चौकशी झाली तर काल सियाच्या आई-वडीलांची चौकशी झाली. काय समोर आले या चौकशीत?
लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून 12 तास चौकशी
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून 12 तास चौकशी सुरू होती. सकळी सुमारे 11 वाजता ते चौकशीसाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यानंतर त्यांची सातत्याने चौकशी होती.
यापूर्वी शुक्रवारी सियाचा भाऊ साहिल गोयल याचीही तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीत काही महत्त्वाची माहिती समोर आल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगितले जात आहे. आज साहिल गोयलही आपल्या आई-वडिलांसोबत पोलीस ठाण्यात उपस्थित आहे.
चौकशीत विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
प्रश्न : सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का?
उत्तर : लग्न ठरल्यापासून सिया आणि केतनचा संवाद सुरु होता. साखरपुडा झाल्यावर ते अनेकदा भेटले, फिरायला ही गेले. या दरम्यान केतन अनेकदा घरी पण आले, मात्र सियाने केतनचा स्वभाव पटत नाही. अशी तक्रार केली नाही.
प्रश्न : सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का?
उत्तर : सियाने मी केतनशी जबरदस्तीने लग्न करत आहे, असं एकदा ही म्हटलं नाही. ती आमची लाडकी लेक आहे, त्यामुळं आम्ही कोणतीही जबरदस्ती केलेली नाही.
प्रश्न : लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का?
उत्तर : याबाबत आम्हाला काहीचं कल्पना नव्हती
प्रश्न : साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का?
उत्तर : साहिलने स्वतः तो चेतनचा मित्र असल्याचं सांगितलं आहे. क्रिकेट खेळण्यासाठी ते एका मैदानावर भेटतात. साहिलचे तसे बरेच मित्र आहेत, त्यापैकी चेतन एक असू शकतो. मात्र साहिल आणि चेतनला आम्ही एकत्र कधी पाहिलं नाही.
प्रश्न : केतनच्या हत्येचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?
उत्तर : सियाने असं काही केलं असेल, यावर आमचा आज ही विश्वास बसत नाही. केतन आमच्या घरी यायचे, सियासोबत फिरायला जायचे. आम्ही नेहमीचं या दोघांना हसत-खेळत असल्याचं पाहिलंय. त्यामुळं असा काही कट रचला जातोय किंवा रचला गेलाय, याबद्दल मनात शंका येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.