गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. नुकताच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, उद्धव ठाकरे यांच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोरीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे, जिथे-जिथे खासदारांनी बंडखोरी केली त्या-त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहेत. उद्धव ठाकरे यांची पहिली सभा ही संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात झाली, त्यानंतर दुसरी सभा ही वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात झाली तर तिसरी सभा ही हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात पार पडली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल देखील मोठा दावा केला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अनेकांना वाटतं दोन पाच खासदार फोडले आणि चार पाच आमदार फोडले म्हणजे शिवसेना संपली. त्यांना कळत नाही आमदार, खासदार हा वेगळा भाग आहे. कट्टर शिवसैनिक हे वेगळे आहेत. हिंगोली मतदारसंघात लागोपाठ दोनदा गद्दारी झाली. आधीचा खासदार गेला. त्याला चोरवाटेने यावं लागलं. निवडून येण्यासाठी लोकांसमोर जाणार कसं. तोंडाला हळद नाही, काळं लागलं. आधीच्या खासदार गेल्या. त्यांनी तर निवडणुकीला उभं राहण्याचं धाडसंच केलं नाही. हिंगोलीची परंपरा आहे. कोणी इकडचा तिकडे गेला तरी शिवसैनिक कायम शिवसेनेसोबत राहिला आहे, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काल विमानात मुख्यमंत्री आणि आम्ही एकत्र प्रवास केला. पत्रकारांनी विचारलं, मी म्हटलं उच्च स्तरीय चर्चा होती. हे म्हणतात ऑपरेशन टायगर, अरे टायगरवर कोणी ऑपरेशन करू शकत नाही, एक पंजा मारला ना, तुमची सगळी आतडी बाहेर येतील. हे ऑपरेशन टायगर नाही. हे ऑपरेशन देवेंद्र आहे. त्यांना वाटतं कदाचित उद्या देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील. म्हणून आताच त्यांचे पंख कापा. महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीला पोहोचता कामा नये, म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेवायचं आहे. म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहांनी त्यांना शिंदेंकडे पाठवलं. हा माझा आरोप नाही, समज आहे. असू शकतो की नसतो. आता निवडणूक थोडीच आहे. मग कशासाठी खासदार फोडले? फोडले तर फोडले ते तुमच्याकडे न घेता तुम्ही जो लाचार ठेवला त्याच्याकडे सरकवले. पंतप्रधानपदी कुणाला मतदान कराल तर अमित शाहांना मतदान करतील, म्हणून ही पुढची व्यवस्था आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.