TET पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM ना करणार मागणी – Marathi News | DCM Eknath Shinde to demand MCOCA charges against the masterminds of the TET paper leak


टीईटी परीक्षा २४ तासांवर असतानाच या परीक्षेचा पेपरफुटला आहे, त्यामुळे उद्या रविवार ( दि.२८ जून) रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.या प्रकरणावरुन राज्य सरकारवर चौफेर टीका होत असतानाच आता प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे. या प्रकरणातील दोषींना पकडून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

TET पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

TET पेपरफुट प्रकरणाची सखोलपणे चौकशी केली जाईल. या प्रकरणातील दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा कोणत्याही संघटित टोळीचा भाग असो, त्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. संबंधित आरोपीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तातडीने छापे टाकून लाखो मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचवले आहे. टीईटी परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना आश्वस्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ही परीक्षा लवकरात लवकर पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने नव्या तारखांना घेतली जाईल. कोणत्याही प्रामाणिक उमेदवाराच्या हक्कावर गदा येऊ दिली जाणार नाही.महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त, गुणवत्तापूर्ण आणि अधिक सक्षम करणे हे महायुती सरकारचे ध्येय असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – शिक्षक आमदार जयंत आंसगावकर

टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आंसगावकर यांनी केली आहे. टीईटी पेपर फुटीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकार मात्र आमदार आणि खासदार खोडाफोडीचे राजकारण करण्यामध्ये मग्न असल्याची टीका जयंत आंसगावकर यांनी केली आहे.  महाराष्ट्रातून सुमारे सात लाख परीक्षार्थी देणार होते. या सर्व उमेदवारांच्या मेहनत आणि तयारीवर पाणी फेरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *