९० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या 'आशिकी' या चित्रपटाने प्रेमाची एक नवीन आणि वेगळी व्याख्या प्रेक्षकांसमोर मांडली. या फिल्मने इतके दणदणती यश मिळवले की राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या नवख्या जोडीला एका रात्रीत सुपरस्टार बनवले. आज ३६ वर्षांनंतरही या चित्रपटातील गाणी अजूनही तितक्याच लोकप्रियतेने ऐकली जातात. या फिल्ममधील एक गाणे इतके गाजले की, ते प्रेक्षकांच्या हृदयात घर करून राहिले. पण अनेकांना याची माहिती नसेल की, हे गाणे मूळचे भारतीय नव्हते, तर ते एका पाकिस्तानी गाण्याची जवळपास हुबेहूब कॉपी होते.
'आशिकी' चित्रपटाची निर्मिती फक्त ३० लाख रुपयांच्या अतिशय छोट्या बजेटमध्ये झाली होती. मात्र, थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाने तब्बल ५ कोटी रुपयांची कमाई केली. याशिवाय, या चित्रपटाच्या ऑडिओ कॅसेटने संगीत उद्योगात खऱ्या अर्थाने भूकंप घडवला. त्या काळात या अल्बमच्या २ कोटींपेक्षा जास्त कॅसेट्स विकल्या गेल्या, जो आजही एक अभेद्य विक्रम मानला जातो. या गाण्यांमुळे गायक कुमार सानू यांना बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख मिळाली.
'आशिकी'मधील सर्वाधिक लोकप्रिय गाणे म्हणजे ‘तू मेरी जिंदगी है’. आजही हे गाणे तितकेच ताजे आणि भावपूर्ण वाटते. कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या मधुर आवाजात साकारलेले हे गाणे संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांनी तयार केले होते.
परंतु, हे गाणे १९७७ सालातील एका पाकिस्तानी गाण्यावरून चोरले गेले आहे. पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायिका तसव्वूर खानम यांनी १९७७ मध्ये हे गाणे गायले होते. नदीम-श्रवण यांनी केवळ संगीतच नव्हे तर गीतकार समीर यांनी मूळ गाण्याचे बोलही जसेच्या तसे हिंदीत वापरले. तरीही या संगीतासाठी नदीम-श्रवण यांना त्यावर्षीचा फिल्मफेयर सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार मिळाला होता.
या चित्रपटामागील कहाणीही खूप रंजक आहे. टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांना सुरुवातीला या गाण्यांचा वापर करून ‘चाहत’ नावाचा केवळ एक म्युझिक अल्बम काढायचा होता. पण जेव्हा दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ही गाणी ऐकली, तेव्हा ते त्या सुरांवर भाळले आणि त्यांनी गुलशन कुमार यांना सांगितले, “या गाण्यांवर अल्बम नको, तर पूर्ण चित्रपट बनवू या.” त्यांच्या या सूचनेतूनच 'आशिकी' चा जन्म झाला. या चित्रपटाच्या अफाट यशानंतर बॉलीवूडमध्ये गझल-स्टाइल प्रेमगीतांची एक मोठी लाट आली.




