शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिले आहे की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात प्रणब मुखर्जी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी प्रणब मुखर्जी यांनी मोदींना निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण काय आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर मोदी यांनी उत्तर दिले की, तब्बल तीन दशकांनंतर एखाद्या राजकीय पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
मात्र प्रणब मुखर्जी यांनी आपल्या नेहमीच्या प्राध्यापकासारख्या शैलीत त्यांना पुन्हा विचारले, “आणखी काय?” मोदी काही क्षण शांत राहिले. त्यानंतर प्रणब मुखर्जी यांनी स्पष्ट केले की, 2014 ची लोकसभा निवडणूक भारतीय इतिहासात वेगळी ठरली कारण या निवडणुकीत प्रथमच पंतप्रधानपदासाठी अधिकृतपणे एका नव्या चेहऱ्याची घोषणा करून निवडणूक लढवली गेली होती.
शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या मते 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला प्रचंड विजय हा केवळ पक्षाचा विजय नव्हता. तर तो नरेंद्र मोदी यांना मिळालेला थेट जनादेश होता. कारण या निवडणुकीत मोदी यांना आधीच पक्षाने अधिकृत पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले होते.
त्यांनी नमूद केले की, यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा अधिकृतपणे जाहीर केला जात नसे. निवडणुकीनंतर निवडून आलेले खासदार, आघाडीचे गणित किंवा परंपरेनुसार पंतप्रधानांची निवड होत असे. मात्र 2014 मध्ये परिस्थिती वेगळी होती.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितले की, 2014 पूर्वी नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात तुलनेने नवे होते. ते दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री राहिले होते. त्या काळात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि मजबूत नेतृत्वाची प्रतिमा उभी केली.
त्यांनी 2014 च्या विजयानंतर नरेंद्र मोदी प्रथमच संसद भवनात दाखल झाले. त्या प्रसंगाचाही उल्लेख केला. संसद भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन मोदी यांनी केलेला प्रणाम हा अत्यंत भावनिक क्षण होता, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या मते प्रथमच खासदार म्हणून निवडून आलेली व्यक्ती थेट भारताचे पंतप्रधान म्हणून संसदेत प्रवेश करत होती. त्यामुळे संसदेच्या पायऱ्यांवर केलेला तो प्रणाम लाखो भारतीयांच्या मनाला स्पर्श करणारा होता.
शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या मते भाजपच्या विजयामागे अनेक कारणे होती. पक्षाचे तळागाळातील मजबूत संघटन, विविध जाती आणि समाजघटकांपर्यंत प्रभावी पोहोच, स्वतःच्या चुका वेगाने ओळखण्याची क्षमता आणि तातडीने आवश्यक बदल करण्याची तयारी यामुळे भाजपला मोठे यश मिळाले. मात्र त्यांनी असेही स्पष्ट केले की, भाजपचा सर्वात मोठा ‘ट्रम्प कार्ड’ म्हणजे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा होती.
त्यांनी लिहिले, भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाने पाहिलेल्या सर्वात प्रभावी पंतप्रधानांपैकी नरेंद्र मोदी हे एक आहेत. ते भारतातील सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान आहेत.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले की, मोदी यांच्या कामकाजाच्या पद्धतीशी अनेकांचे मतभेद असू शकतात. मात्र, त्यांच्या करिष्म्याला नाकारता येणार नाही. त्यांच्या मते 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही हा करिष्मा स्पष्टपणे दिसून आला. त्यांनी लिहिले, तुम्ही मोदींवर प्रेम करू शकता किंवा त्यांचा तिरस्कार करू शकता; पण ‘ब्रँड मोदी’कडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे.
9 जून रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सलग 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. निवडून आलेल्या सरकारचे नेतृत्व करणारे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या विधानाचे स्वागत केले. एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यात राजकीय मतभेद असूनही अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. मोदी यांनी नेहमीच प्रणब मुखर्जी यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा आदर केला. त्याचप्रमाणे प्रणब मुखर्जी यांनीही नरेंद्र मोदी हे अनेक दशकांनंतर भारताला लाभलेले पिढी घडवणारे नेते असल्याचे मान्य केले होते.
पूनावाला म्हणाले की, थेट जनतेच्या पाठिंब्याच्या आधारे पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले नेते म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी. त्यामुळे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केलेले विश्लेषण योग्य असल्याचे त्यांनी म्हटले.