मुंबई : देशात संविधान लागू झालं त्यावेळी सगळी दादागिरी, पाटीलकी संपली आहे. त्यामुळे पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय पाटील (Sanjay Dina Patil) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करावा अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांनी केली. एकनाथ शिंदे हे आयडॉलॉजिकली अनफिट आहेत, हे असंच सुरू राहिलं तर शिंदे टोळी असं नाव पडेल, अशी टीकाही त्यांनी केली. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उघड धमकी दिली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या घटनेवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली.
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “अशा प्रवृत्त घटनेचा सगळ्यांनी सगळ्या राजकीय पक्षांनी निषेध करावा. संजय पाटील यांच्याशी माझा कधी संबंध आला नाही. संजय दिना पाटील हे लोकसेवक आहेत. ज्या दिवशी देशात संविधान लागू झालं त्या दिवशी पाटीलकी आणि राजेशाही, दादागिरी संपली आहे. पोलिसांनी कुणाच्याही आदेशाची वाट न पाहता संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. पोलिसानी राजकारणाची चिंता करू नये.”
Gunratan Sadavarte On Sanjay Dina Patil : कोणत्या पाच लोकांना मारलं?
आज ज्या प्रकारे पत्रकारांना शिव्या दिल्या त्या पाहता एकनाथ शिंदे यांनी शरमेनं मान खाली घातली पाहिजे. त्यांचं वर्तन जर असंच सुरू राहिलं तर शिंदे टोळी असं नाव पडेल, असा टोला सदावर्ते यांनी लगावला. संजय दिना पाटील म्हणतात की त्यांनी पाच लोकांना मारलं. ते पाच खून कोणाचे केलेत ते त्यांनी सांगावं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करणे गरजेचं आहे, अशी मागणी सदावर्तेंनी केली.
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे म्हणजे सर्वकाही नाहीत. संजय दिना पाटील यांनी माजलेली भाषा वापरली. एकनाथ शिंदेंनी राजकारणात काय मिळवलं ते आज दिसून आलं. एकनाथ शिंदे यांना राजकारणात काहीही आयडॉलॉजी नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे खपवून घेणार नाहीत. त्यांनी संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करावी.”
पत्रकारांच्या केसालाही धक्का लावला तर संजय दिना पाटील यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा सदावर्तेंनी दिला. राज्याचे मुख्यमंत्री कायद्याने वागणारे आहेत, ते या प्रकरणी योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा सदावर्तेंनी व्यक्त केली.
ही बातमी वाचा:
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?