शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट तयार झाली. यानंतर पक्षाने व्हिप जारी करून आपल्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. ज्यानंतर या खासदारांवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. ओमराजे निंबाळकर यांनीही ठाकरे गटाची साथ सोडली. हा ठाकरेंना थेट धक्का होता. वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमधील निकाल आपल्या बाजूने लागला नाही, त्यानंतर ओमराजे निंबाळकर थेट धाराशिवमध्ये पोहोचले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत जाहीर केले की, आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहोत.
यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. आता उद्धव ठाकरे धाराशिव दाैऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान 18 कोटीच्या निधीवरून धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजीत सिंह पाटील यांच्या श्रेयवाद पेटला आहे. दोघांकडूनही सोशल मीडियावर पत्रकबाजी आणि महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.
ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रवेश करताच धाराशिव नगरपालिकेला 18 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं सांगितलं. दुसरीकडे यापूर्वीच आम्ही पाठपुरावा करून तो निधी घेतलाय, असा दावा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. ओमराजे निंबाळकर महायुतीमध्ये गेले तरी पाटील निंबाळकर वाद कायम राहणार का? अशी चर्चा रंगताना दिसत आहे.
शहरातील आठवडी बाजार विकसित करणे -8 कोटी रुपये, राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे -5 कोटी रुपये,
छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे -3 कोटी रुपये, बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करण्यासाठी -2 कोटी रुपये असा एकूण 18 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. आता त्यावरूनच जोरदार वाद पेटल्याचे बघायला मिळत आहे.