श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ चित्रपटाच्या नावावर आक्षेप, राष्ट्रवादी चित्रपट विभागाची मागणी काय? – Marathi News | NCP Objects To Vithabai Narayangaonkar Biopic Name


लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित निर्मिती होत असलेल्या बहुचर्चित ‘ईठा’ या चित्रपटाच्या नावावर राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने आक्षेप नोंदवला आहे. विठाबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा आणि लोककलेतील अमूल्य योगदानाचा योग्य सन्मान व्हावा यासाठी चित्रपटाचे नाव ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ असे करण्यात यावे, अशी मागणी विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात निर्माते दिनेश विजान, लेखक-दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आणि मेडडॉक फिल्म्स प्रॉडक्शन यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाची मागणी

बाबासाहेब पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या लोककला परंपरेचा अभिमान असलेल्या लावणी आणि तमाशा कलाप्रकाराला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्यात विठाबाई नारायणगावकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत आहे. मात्र, चित्रपटाचे ‘ईठा’ हे नाव विठाबाई यांच्या नावाशी थेट संबंधित नसल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रात संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले की, ज्या महान कलाकाराच्या जीवनसंघर्षावर आणि कर्तृत्वावर हा चित्रपट आधारित आहे, त्या कलाकाराचे नाव विठाबाई नारायणगावकर आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शीर्षकातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान व्यक्त होणे आवश्यक आहे. ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ हे नाव चित्रपटाला अधिक समर्पक ठरेल. यामुळे नव्या पिढीपर्यंत त्यांच्या कार्याची आणि इतिहासाची अचूक ओळख पोहोचेल. विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अद्वितीय कलाविष्कारातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला नवी उंची दिली. त्यांच्या योगदानाचा गौरव करणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. त्यामुळे चित्रपटाच्या नावातूनच त्यांच्या कार्याचा सन्मान आणि वारशाचे जतन होणे गरजेचे आहे.

श्रद्धा कपूर साकारणार विठाबाईंची भूमिका

दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर ‘ईठा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. मराठी संस्कृतीशी असलेले तिचे नाते आणि अभिनय कौशल्य लक्षात घेऊन तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *