शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. 5 खासदार अज्ञातस्थळी आहेत. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या बंडखोरी केलेल्या खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर काल मुंबईहून पुण्यात गेले. पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये काल कोर्टाने निकाल दिला. त्यानंतर ओमराजे निंबाळकर आपल्या पुण्यातील घरी परतले. त्यावेळीच त्यांनी स्पष्ट केले होते की, आपली राजकीय भूमिका दोन ते तीन दिवसात आपण स्पष्ट करू. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीला अनेक नेते पोहोचले. संजय राऊत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल विधान करत त्यांच्यावर टीका केली. हेच नाही तर उद्धव ठाकरे यांनीही ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, मी अजून निर्णय घेतला नाही. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेईल.
आता ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यासाठी मोठे प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाकडून केली जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीला पोहोचले. मोठी खेळी ठाकरे गटाकडून खेळली जात आहे. जर ओमराजे निंबाळकर यांचा बंड शांत झाला तर बंडखोरी केलेले 5 खासदार धोक्यात येऊ शकतात.
वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांच्या मध्यरात्रीच्या भेटीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण साळी यांनी टीका केली. किरण साळी यांनी म्हटले की, राञीच्या अंधारात गाड्या बदलून कपडे बदलून तोंड झाकून वरुण सरदेसाई आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी या ठिकाणी आले. एकीकडे त्यांच्या खासदारांना प्रवक्ते संजय राऊत गद्दार खोके अश्लील घाणेरड्या शिव्या देतात.
दुसरीकडे वरुण सरदेसाई आणि बाकीचे त्यांचे सहकारी त्यांना गुपचूप भेटून त्यांच्या पाया पडायला येतात. विचाराने आणि त्यांची पातळी किती खाली गेली आहे बघा. ऐकीकडे शिव्या द्यायच्या आणि निम्म्या रात्री येऊन त्यांच्या पाया पडायचं. दोन वर्षात खासदारांना जी वागणूक दिली ते खासदार विसरणार नाहीत. मिशन टायगर सक्सेसफुल झालं आहे. पब्लिकली प्रेस कॉन्फरन्समध्ये मेळाव्यामध्ये शिव्या द्यायच्या आणि मध्यरात्री त्यांच्या पाया पडायला यायचं.