शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता ऑपरेशन टायगरमध्ये मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. त्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव होतं. ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु आता ओमराजे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
शनिवारी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला आहे, या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. हा ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे. अजून पक्षप्रवेशाचं ठरलेलं नाही, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि मगच पुढचा निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. एवढंच नाही तर या निकालाचा आणि पक्षप्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला, त्यावेळी एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर अमित शाहा यांच्या बाजुलाच होते, फोन येताच त्यांनी ताडकन बाजूला जात तो फोन रिसिव्ह केल्याचं पहायला मिळालं. हा फोन ओमराजे निंबाळकर यांचाच असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान ओमराजे यांच्या तळ्यात -मळ्यात भूमिकेमुळे आता शिवसेना शिंदे गटात अस्वस्था निर्माण झाली आहे.