गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे, त्यातच शिवसेना ठाकरे गट देखील काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहे, अशी देखील चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली, तब्बल 6 खासदार पक्षातून फुटले, या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुढचं पाऊल काय असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, अखेर आज शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपली पुढची दिशा स्पष्ट केली आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मी ज्येष्ठ शिवसैनिक आहे. कारण माझ्यासमोर शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फुटला आहे. त्या क्षणाला मी तिथे होतो. तुम्ही नव्हता. त्या नारळाचे तुषार माझ्यावर उडाले. ते तुषार मला एवढे भिजवतील की माझ्यावर शिवसेनेची जबाबदारी येईल असं वाटलं नव्हतं. मातोश्रीवर जे जळतात ठाकरे कुटुंबावर जळतात त्यांना ठाकरे कुटुंबाने काय काय भोगलं आणि काय काय केलं हे माहीत आहे का? शाहू फुले आंबेडकर यांनाही त्रास झाला. महात्मा फुले सावित्रीबाईंवर तर शेणाचा मार झाला. प्रबोधनकार ठाकरेंनाही काय काय भोगावं लागलं. का तर कर्मठ आणि बामणी वृत्ती होती. ते वाईट परंपरा तोडण्यासाठी उभे राहिले. घराचा पत्ता नाही. महाराष्ट्रभर फिरले.
या ६० वर्षात अनेकांनी खस्ता खाल्ल्या. काही आपल्यात आहेत. काही नाही, त्यांना अभिवादन करतो. या सर्वांनी जे जे कष्ट घेतले. ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसत आहे. हे काही संकट नाही. संकट अनेक आली, ज्यावेळेपासून आपण आपलं यश अपयश निवडणुकीशी तुलना करू लागलो तिथे फसलो. शिवसेनाप्रमुखांनी उत्तर दिलेलं आहे. इंद्रजित गुप्ता गृहमंत्री होते. एक घटना घडली. सरकार बरखास्त होण्याची शक्यता होती. ते इथे आले. इंद्रजित गुप्तांना भेटायला आम्ही आलो. त्यांचा चेहरा बुलडॉग सारखा होता. बाळासाहेब म्हणाले, तुम्ही काय कराल. माझं सरकार बरखास्त कराल. आम्ही सत्तेतासाठी जन्माला आलो नाही. सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे.
या ६० वर्षात आणीबाणी आली, तो काळ भयानक होता. त्यावेळी रजनी पटेल, आज जे आहेत. त्यांच्याच राज्याचा तो शिवसेनेच्या मुळावर उठला होता. त्यांनी पत्र दिलं, सही नाही केली तर आत जाल. शिवसेना काँग्रेसमध्ये विलिन करा असं होतं. आज जे बोंबलत आहेत, ३० वर्ष भाजपात विलिन नाही झालो. तर काँग्रेसमधून कुठे विलिन होणार, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.