Eknath Shinde Critirizes Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंड केलं आहे. हे सहा खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी तर बंडखोर खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा राबवले जाईल, असा इशारा दिला. मतदारसंघात बंडखोर खासदार दिसताच, त्यांना तुडवा, असा आदेशच राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, आता ठाकरे गटाच्या याच ऑपरेशन तुडाववर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य केलं आहे. त्यांनी राऊतांना तसेच ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे. हिम्मत असेल तर पुढे या, असं खुलं आव्हान शिंदे यांनी दिले आहे. ते शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.
काही लोक म्हणाले की लांडग्यांचे ऑपरेशन करतो. परंतु तो तर कंपाऊंडर आहे ना. कंपाऊंडर कसं ऑपरेशन करणार. इथे श्रीकांत शिंदे खरे डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. पण ऑपरेशन करायला वाघाचं कळीज लागतं लांडग्यांचं नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडका वाघ होत नाही. चार वर्षापूर्वी मला याच लांडग्यांनी धमक्या दिल्या होत्या. मुंबईत यावंच लागेल. वरळीतून जावंच लागेल. मुंबई कोणाची जहागीर आहे का. एकनाथ शिंदे तेव्हा एकटा आला. त्यावेळी एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवून गाडीमध्ये गेलो. बयरोड वरळीतून गेलो. मी वरळीत जाऊन थांबलो, असं यावेळी शिंदे म्हणाले.
हिम्मत असेल तर समोर या
मला धमक्या देणारे मला तेव्हा ऑनलाईन पाहात होते. आता म्हणतात की तुडवा ऑपरेशन राबवायचं. हिम्मत असेल तर समोर या. आमचे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असे रामदास कदम म्हणाले आहेत, असं खुलं आव्हान शिंदे यांनी राऊत आणि उद्धव ठाकरे यांना त्यांच नाव न घेता केले. आमचे कडवे शिवसैनिक आहेत.आमचे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे आहेत. सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या. संध्याकाळी खासदारांना चांगलं म्हणायचं. सेनापतीने घरी बसून चालत नाही. सेनापतीने समोर येऊन लढावं लागतं, अशी बोचरी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे
हा एकनाथ शिंदे नेहमी छातीचाकोट करून लढणार आहे, असं मी माझ्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो. हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे. त्यांच्या हातातून महापालिका गेल्या, ग्रामपंचायती गेल्या, जिल्हा परिषदा गेल्या. मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे म्हणून त्यांनी जोर दिला. परंतु लोकांनी महायुतीला पसंती दिली. मुंबईत शंभर टक्के काँक्रिटचे रस्ते होणार आहेत. मेट्रो बंद होती, मेट्रोचे काम सुरू केले. समृद्धी महामार्ग सुरू केला. कोस्टल रोड सुरू केला. म्हणूनच जनतेने महायुतीला विजय मिळवून दिला. यांचं दिल्लीतही तेच, दिल्लीतही तेच आहे. त्यांची इंडिया आघाडी बुडाली आहे. कितीही शून्य एकत्र आले तरी बेरीज शून्यच येते, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला.