Shrikant Shinde on UBT MP Revolt : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात बंडखोरी झाली आहे. यावेळी एकूण सहा खासदारांनी बंड केलं आहे. या बंडखोरीनंतर आता राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. सहा खासदारांनी ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतलेला असला तरी त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची अद्याप घोषणा झालेली नाही. या खासदारांचा प्रवेश सोहळा काही दिवस लांबल्याचे सांगितले जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातर्फे ऑपरेशन टायगर अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर पहिल्यांदाच सर्वात मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे दोन दिवसांनी खूप काहीतरी मोठं घडणार असल्याचा, अंदाज व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडतंय?
ठाकरेंचे सहा खासदार त्यांच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला हजर नव्हते. त्यानंतर आता सहा खासदार फुटल्याचे निश्चित झाले आहे. या सर्व खासदार फुटीच्या प्रकरणात शिंदे गटातील कोणत्याही बड्या नेत्याने ठोस प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल सगळं स्पष्ट होईल, असे सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
जो गरजते है, वो बरसते नाही
खासदारांच्या बंडखोरीनंतर जे पक्ष सोडून गेले त्यांना तुडवा असा आदेशच ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यावर बोलताना जो गरजते है, वो बरसते नाही, असा पलटवार श्रीकांत शिंदे यांनी केला. बंडखोरी केलेल्या खासदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर बोलताना ते जेवढा आरोप आमच्यावर करतील, ते जेवढे बोलतील तितका आमचा फायदा होईल, असं थेट विधान श्रीकांत शिंदे यांनी केलं.
आजच घोषणा व्हावी ही इच्छा
खासदारांच्या बंडखोरीवर योगेश कदम यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. खासदार आमच्या सोबत यायचा निर्णय घेणार आहेत. किंवा त्यांनी याआधीच निर्णय घेतला असं म्हणावं लागेल. ते आमच्यासोबत जोडले जात असतील तर ते आमच्यासाठी चांगलं आहे. आमचे नंबर वाढतील, आमची ताकद वाढेल. आमची इच्छा आहे आजच घोषणा व्हावी. काय होतं ते बघुयात, असं योगेश कदम म्हणाले.