सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आणि यूट्यूबर प्रसाद वेधपाठक सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने घाटकोपर येथील त्याच्या सोसायटीमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने जैन साध्वींसाठी इमारतीच्या परिसरात एक वेगळा पांढरा पट्टा मारल्याचे दाखवले. कोणाचीही परवानगी न देता हा पट्टा मारण्यात आला होता. त्यानंतर जैन समाज आक्रमक झाला होता. प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मनसेकडे मदत मागितली होती. आता पुन्हा एक व्हिडीओ प्रसादने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अक्षरश: हात जोडले आहेत.
काय म्हणाला प्रसाद वेदपाठक?
प्रसाद वेदपाठकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने न्या मागितला आहे. “नमस्कार, मंडळी आमच्या सोसायटीमध्ये जो पांढऱ्या पट्टीचा वाद झालाय, त्यानंतर आमचं पूर्ण आयु्ष्य बदललंय. 4 तारखेला वाद झाला, 8 तारखेला त्यांना आम्ही भेटलो, 9 तारखेला ती पट्टी ज्यांनी मारलेली त्यांनी हटवली. त्यानंतर 11 तारखेला आमच्या इथले नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पोलिसांना एक लेटर दिलं आणि माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. या सर्व घडामोडींमध्ये बरीच लोक आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पाठलाग केला जातोय, घरी माणसंही आलेली आमच्यावर दबाव आणण्यासाठी, धमकावण्यासाठी… या सर्व गोष्टींचे साक्षीदार माझे आई-वडील, माझे सासरे, माझा भाऊ, माझी बायको दीपिका हे आहेत” असे प्रसाद वेदपाठक म्हणाला.
मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत
पुढे तो म्हणाला, “मी तुम्हाला आता हे सर्व सांगतोय कारण मला माहीत नाही की, माझं काय होईल पुढे. माझ्यावर सर्व बाजूंनी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, मला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय. मला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट किंवा असं काही मिळत नाहीये, फक्त मनसेनंच मला पूर्ण पाठिंबा दिलाय. राजसाहेब, अविनाश दादा, संदीप सर. प्लीज जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, यांनी मला अडकवलं, तुम्हाला सगळं खरं, सत्य माहितीये, हा वाद पांढऱ्या पट्टीपासून सुरू झाला आणि आता याला भलतीच दिशा दिली जात आहे. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकतो. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करतोय की, प्लीज सर हे खूपच चुकीचं सुरूये, प्लीज माझ्याबाबत जाणून घ्या, मी काय आहे, मी कसे माझे फॉलोअर्स कमावलेत, माझे लोक मला काय मानतात, मी देशासाठी काय करतोय, प्लीज हे जाणून घ्या. कारण या गोष्टींची पूर्ण तपासणी करा. कारण बऱ्याच लोकांची मनं दुखलीत, बऱ्याच खोट्या गोष्टी माझ्याविरोधात स्प्रेड केल्या गेल्यात, अशा गोष्टी ज्या मी बोललोच नाहीय, त्यामुळे एक निगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झालंय, सगळे नुसते माझ्या जीवावर उठलेत.”