ठाकरे गटात फूट… पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींचे नाव घेत गंभीर आरोप, म्हणाले; प्रचंड भ्रष्टाचार… – Marathi News | Prithviraj chavan alleges corruption after shiv sena ubt split targets pm modi


गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. गेल्या 4 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षात दोनदा फूट पडलेली आहे. आता 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील, वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील या राजकीय परिस्थितीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. चव्हाण यांनी थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ठाकरे गटात फूट पडली – चव्हाण

6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की ऑपरेशन लोटस, टायगर, लायन ती काय मला जनावरांची नावे माहिती नाहीत. परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटात विभाजन झालेलं आहे अशा बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलेलं आहे त्यामुळे पक्षात फूट पडलेली आहे.

पंतप्रधान मोदींचे नाव घेत गंभीर आरोप…

पुढे बोलताना चव्हाण यांनी म्हटले की, नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन विधेयकामध्ये बदल करून उत्तर भारतीय राज्यांच वर्चस्व निर्माण करायचं आहे. महिला आरक्षणाचे खोटं नाव सांगून देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न आहे. देशामध्ये एका माणसाची हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न चालू असून हा लोकशाहीच्या दृष्टीने काळा दिवस आहे. एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला ईडीची भीती या दुहेरी कचाट्यातून राजकारण करणे अडचणीचे झालेला आहे. तुम्ही पक्षात येत असाल तर खोके मिळतील, कॉन्ट्रॅक्ट मिळेल. त्यातून 40% कमिशन खावा, प्रचंड भ्रष्टाचारी सरकार नरेंद्र मोदींचे आहे. त्यांचे एकमेव उद्दिष्ट फक्त सत्ता मिळवणे हेच आहे.

रोहित पवारांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं… हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *