राज्यात गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. हे खासदार उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराज असून आगामी काळात ते पक्षातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठं विधान केलं आहे. सरनाईक नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
24 तास…
शिवसेनेत सतत पक्षप्रवेश होत आहेत, यावर बोलताना सरनाईक यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यकर्ते, शिवसैनिक, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांना पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांच्यासाठी 24 तास 365 दिवस दरवाजे खुले आहेत. आजही एकनाथ शिंदे रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत जर आवडत असेल आणि त्यांना पक्षात प्रवेश करायचा असेल आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत.
आमदार खासदारांचे स्वागत…
उद्धव ठाकरेंचे किती खासदार संपर्कात आहेत यावर बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, याबाबत मला माहिती नाही, मात्र मला वाटतं की प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे. ज्यांना आमच्या विचारधारेवर आणि एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे, बाळासांहेबांचे विचार पुढे नेण्याची मनात इच्छा असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी 24 तास 365 दिवस दरवाजे उघडे आहेत.
आमची संख्या वाढू शकतो…
शिवसेनेच्या वर्धापन दिनी आमदार खासदारांची संख्या वाढलेली दिसेल का? या प्रश्नावर बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, पुढे काय होतयं ते पाहू, आज मी त्यावर बोलू शकत नाही. एखादा निर्णय झाला आणि आमची संख्या वाढली तर ती आमच्यासाठी चांगली बाब आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे यांचे अनेक खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे आगामी काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.