अनंत कळसे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. हे खासदार लवकरच नवा गट स्थापन करणार असून, लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, या पार्श्वभूमीवर माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. यावेळी ऑपरेशन टायगरसंदर्भात एकनाथ शिंदे यांनी अनंत कळसे यांच्याकडून कायदेशीर माहिती घेतल्याची चर्चा आहे. नंदनवन बंगल्यावर अनंत कळसे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं काय म्हणाले अनंत कळसे
कायद्यामध्ये असं आहे की, दहावी अनूसुची जी आहे ती 1985 साली भारतीय सविंधानामध्ये दाखल झाली. त्याचा उद्देश असा होता की पक्षांतर होऊ नये. आपल्याला मागचं प्रकरण आठतंय, की भजनलाल नावाचे मुख्यमंत्री होते, ते चाळीस जणांचा पक्ष घेऊन दुसऱ्या पक्षात विलीन झाले होते. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा करण्यात आला. दहाव्या अनुसूचीमध्ये यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
आता याप्रकरणामध्ये असं दिसून येत आहे की, उद्धव ठाकरेंचे 9 खासदार आहेत. त्यापैकी दोन तृतिआंश जर पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी जर दुसऱ्या पक्षात त्यांचा पक्ष विलीन केला तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं, अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे मला वाटतं की तशा पद्धतीने घडामोडी घडू शकतात, हे वृत्तवाहिन्यांवर तरी सध्या दिसत आहे. मला वाटतं की हे 9 खासदार स्वतंत्र गट स्थापन करतील आणि कुठल्यातरी पक्षात विलीन होतील. जर या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं तर ते ग्राह्य मानलं जाईल. या पत्रानंतर मुळ पक्षात फूट पडली का? हे देखील तपासलं जाईल. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा हाय कोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाईल, अशी माहिती यावेळी अनंत कळसे यांनी दिली आहे.